टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध जोडी किरण करमरकर आणि रिंकू धवन विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मंगळवारी समोर आली. १५ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. विभक्त होण्याच्या वृत्ताला किरण आणि रिंकूनेही दुजोरा दिला आहे. ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिलेल्या माहितीत ती म्हणाली, ‘हो, किरण आणि मी एकत्र राहत नाही. घटस्फोटासाठी अर्ज करण्याचा अंतिम निर्णय मी अद्याप घेतलेला नाही.’ गेल्या १२ ते १५ महिन्यांपासून दोघेही वेगळे राहत असल्याचे रिंकूने स्पष्ट केले असून त्याचे नेमके कारण तिने सांगितले नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, सतत वाद होत असल्याने मनात एकमेकांबद्दल कटुता बाळगून एकत्र राहण्यापेक्षा विभक्त होण्याचा मार्ग त्यांनी निवडल्याचे कळते. यासंदर्भात किरणशी संपर्क साधला असता तो म्हणाला, ‘आयुष्यात अशा गोष्टी होतच असतात. मी अगदी सामान्य माणूस आहे, ज्याला पार्ट्यांमध्येही जाणे आवडत नाही. त्यामुळे आमच्या विभक्त होण्याचे कारण प्रसारमाध्यमांना सांगणे मला गरजेचे वाटत नाही.’

वाचा : बियॉन्सेच्या फोटोची खिल्ली उडवल्याने ऋषी कपूर ट्रोल

एकता कपूरच्या ‘कहानी घर घर की’ या प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. या मालिकेत त्यांनी बहिण-भावाची भूमिका साकारली होती. त्यावेळी दोघांमधील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी २००२ मध्ये विवाह केला.