सध्या देश करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशात अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांची कमतरता भासू लागली आहे. देशभरातून व्यवस्थेवर, प्रशासनावर, सरकारवर टीकेची झोड उठत आहे. अनेक कलाकारही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत व्यवस्थेवर टीका करत आहेत. अशावेळी अभिनेता वीर दास याने ट्विट करत ही लोकशाही असल्याची जाणीव लोकांना करुन दिली आहे.
आज सकाळीच त्याने हे ट्विट केलं आहे. यात तो म्हणतो, “सगळ्यांना आठवण करुन देतो की तुम्हाला कोणत्याही सरकारवर अथवा नेत्यावर टीका करण्याची आणि त्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी आहे. या कठीण काळात तुम्हालाच उपाय माहित असणं अपेक्षित नाही. ही निगेटिव्हीटी नसून लोकशाही आहे. हॅप्पी संडे!”
त्याच्या या ट्विटला लोकांनी मोठ्या प्रमाणावर रिट्विट केलं आहे. अनेकांनी त्याच्या या ट्विटवर कमेंट्स केल्या असून त्याच्या विचारांशी सहमतीही दर्शवली आहे. अनेकांनी त्याच्या या भूमिकेबद्दल त्याच्यावर टीकाही केली आहे.
Hey all,
Gentle reminder that you’re allowed to question and criticise any govt or leader during a crisis without being expected to know the solution yourself. That’s not negativity, it’s democracy.That’s all
Happy Sunday!
— Vir Das (@thevirdas) April 25, 2021
आणखी वाचा- “महासत्ता होणार म्हणे…महाथट्टा नक्कीच झालीय”, हेमंत ढोमेची संतप्त प्रतिक्रिया!
दरम्यान, देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, आरोग्य सुविधांसह औषधांचा तुटवडा, करोनाबाधितांचे होत असलेले हाल… यावरून मतं मांडणाऱ्या आणि करोना परिस्थिती हाताळण्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या काही नेते व अभिनेत्यांसह काही जणांनी केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यास केंद्राने ट्विटरला सांगितलं. त्यावरून काही अकाऊंटवरील ट्विट्स ब्लॉक करण्यात आले आहेत.
खासदार रेवंथ रेड्डी, पश्चिम बंगालचे मंत्री मुलोय घातक, अभिनेता विनीत कुमार सिंह आणि चित्रपट निर्माते विनोद कापरी आणि अविनाश दास यांच्यासह काही जणांनी करोना आणि कुंभमेळ्याबद्दल केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ट्विटर इंडियाला नोटीस बजावल्यानंतर नमूद करण्यात आलेले ट्विट ब्लॉक करण्यात आले असून, ब्लॉक करण्यात आलेले ट्विट भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग करणारे होते, असं ट्विटरने म्हटलं आहे.