आमिर खान हा चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि त्याच्या भूमिकांसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. आमिरने आजवरच्या कारकिर्दीत ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘अंदाज अपना अपना’, ‘सरफरोश’, ‘दिल चाहता है’, ‘लगान’, ‘तारे जमीन पर’, ‘गजनी’, ‘पीके’ आणि यांसारख्या अनेक चित्रपटांमधून अभिनयाची छाप सोडली आहे.

आमिरने प्रत्येक चित्रपटातील भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर अभिनेता म्हणून स्वत:ची एक वेगळी बाजू समोर आणली आहे. यापैकीच एक म्हणजे ‘पीके’मधील भूमिका. घोषणा झाल्यापासूनच ‘पीके’ चित्रपट अनेक सकारात्मक व नकारात्मक कारणांनी चर्चेत होता. या चित्रपटातील भूमिकेबद्दल आमिरला बऱ्याच प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. पण याउलट अनेकांनी या चित्रपटाचं कौतुकही केलं.

अशातच या चित्रपटाच्या आणि आमिर खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे ‘पीके’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याचं म्हटलं जात आहे. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, आमिर खान आणि राजकुमार हिरानी हे ‘पीके २’ बनवण्याचा विचार करत आहेत. चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू झाले आहे. तसंच या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरची भूमिका असल्याचंही म्हटलं जात आहे.

वृत्तानुसार, चित्रपटात रणबीर एलियनची भूमिका साकारणार असून यासाठी तो खूप उत्सुक आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण तरी ‘पीके’ चित्रपट आणि आमिर व रणबीरचे चाहते दुसऱ्या भागासाठी चांगलेच उत्सुक आहेत. दरम्यान, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आमिर पुन्हा एकदा मोठ्या पडद्याद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे.

आमिर ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात त्याच्यासह अभिनेत्री जिनिलीया देशमुखही मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय आमिरने काही दिवसांपुर्वी ‘महाभारत’सारख्या चित्रपटात काम करायचं असल्याची इच्छा व्यक्त केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबद्दल त्याने “माझं एक स्वप्न आहे की, मला महाभारतावर आधारित चित्रपट बनवायचा आहे आणि ‘सितारे जमीन पर’नंतर मी त्यावर काम सुरू करणार आहे. माझा शेवटचा चित्रपट महाभारत चित्रपट असू शकतो, जो केल्यानंतर मला असं वाटू शकतं की, आता यानंतर मला काहीच करायचं नाही.”