Aamir Khan and Juhi Chawla Did Not Speak For Seven Years: ‘आतंक ही आतंक’, ‘लव्ह लव्ह लव्ह’, ‘इश्क’, ‘हम हैं राही प्यार के’, ‘कयामत से कयामत तक’, ‘अंदाज अपना अपना’ अशा अनेक चित्रपटांत अभिनेता आमिर खान व अभिनेत्री जुही चावला यांनी एकत्र काम केले आहे.
९० च्या दशकात हे दोन्ही कलाकार लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यांनी एकमेकांबरोबर, तसेच इतर कलाकारांबरोबर गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे. अनेकदा जुही व आमिर खानच्या मैत्रीबद्दल बोलले जाते. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, जुही चावला व आमिर खान यांच्यात सात वर्षे अबोला होता. आता आमिर खानने एका मुलाखतीत याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी त्याने असेही स्पष्ट केले की, त्याचे व जुहीचे भांडण संपावे, असे त्याची पूर्वाश्रमीची पत्नी रीना दत्ता यांना वाटत होते.
आमिर खान व जुही चावला यांच्यात सात वर्षे होता अबोला
आमिर खानने नुकतीच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी आमिर खान म्हणाला, “एकदा किरण व माझे भांडण झाले होते. त्यावेळी मी तिच्याशी चार दिवस बोललो नव्हतो. त्यामुळे ती रडली होती. अशीच परिस्थिती एकदा माझ्यात व जुहीमध्येदेखील झाली होती.”
“एकदा माझे व जुहीचे भांडण झाले होते आणि ते सात वर्षे सुरू होते. जर माझे कोणाशी मतभेद झाले. भांडण झाले. आणि त्यानंतर मी त्या व्यक्तीला माफ केल्यानंतर मला फार वाईट वाटायचे. मला फार दु:ख व्हायचे. हा माझ्यातील सर्वांत मोठा रेड फ्लॅग होता.”
“जुहीच्या एका छोट्या गोष्टीवरून मी नाराज झालो होतो. आम्ही एकत्र काम करत होतो; पण मी तिच्याशी बोलायचो नाही. मी सात वर्षे तिच्याशी बोललो नाही. तिनं माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; पण मला काही फरक पडायचा नाही. रीना मला म्हणायची की, कसं वागत आहेस? तिला भेट आणि हे भांडण संपव.”
काही वर्षांपूर्वी आमिर खानने माध्यमांशी बोलताना त्याच्या व जुहीच्या भांडणाबद्दल सांगितले होते. इश्क या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांचे भांडण झाल्याचे आमिरने सांगितले होते. मात्र, जेव्हा रीना दत्ता यांच्याबरोबर आमिरचा घटस्फोट झाला, त्य.नंतर त्यांच्यातील भांडण मिटले, असे वक्तव्य त्याने केले होते.
आमिर खानने म्हटले होते, “जेव्हा जुहीला माझ्या व रीनाच्या घटस्फोटाबद्दल समजले. तेव्हा तिने मला फोन केला. ती माझ्या व रीनाच्या दोघांच्या जवळची होती. मी तिचा फोन उचलणार नाही, हे तिला माहीत होते. पण, तरीही तिनं मला फोन केला. ती गोष्ट माझ्या मनाला स्पर्शून गेली. मला त्यावेळी जाणवी झाली की, छोट्या छोट्या गोष्टींचा आमच्या मैत्रीवर परिणाम झाला नाही. आम्ही जरी एकमेकांशी बोलत नव्हतो, तरी आम्ही एकमेकांची काळजी करत होतो.”
आमिर खानच्या कामाबाबत बोलायचे, तर तो लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.