Dia Mirza Recalls Hard Terrifying Years: तमीळ चित्रपटात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून अभिनेत्री दिया मिर्झाने अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. दिया मिर्झाने २००० साली मिस आशिया पॅसिफिक इंटरनॅशनल जिंकले. त्यानंतर अभिनेत्रीने ‘रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिला बॉलीवूडमध्ये काम करताना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, याबद्दल वक्तव्य केले. अभिनेत्री म्हणाली की, इतर अभिनेत्रींच्या पालकांचा पाठिंबा असतो. मला तो पाठिंबा नव्हता. कारण- मी चार वर्षांची असताना माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. मी नऊ वर्षांचे असताना माझ्या वडिलांचे निधन झाले.

स्वत:ची जागा निर्माण करणं…

दियाने नुकतीच ऑफिशियल ‘पीपल ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की, चित्रपटसृष्टीची तिला काहीच पार्श्वभूमी नव्हती. तर तिने इंडस्ट्रीमध्ये तिची जागा कशी निर्माण केली? यावर दिया म्हणाली, “एक दिवस मला यावर पुस्तक लिहावं लागेल. पण, इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची जागा निर्माण करणं खूप कठीण आणि तो काळ भयानक होता.”

याच मुलाखतीत अभिनेत्रीने असाही खुलासा केला की, ती खूप काळपर्यंत तिच्या हेअरड्रेसरबरोबर खोलीत राहत असे. अभिनेत्री म्हणाली, “कोणीही कधीही भेटायला येऊ नये म्हणून अनेक वर्षं माझ्या हेअरड्रेसरबरोबर रूम शेअर केली. तो काळ खरंच खूप कठीण होता. जेव्हा मी मागे वळून पाहते आणि विचार करते की, मी त्या सगळ्या गोष्टी कशा केल्या माहीत नाही.”

“इंडस्ट्रीमध्ये अनेक महिला कलाकारांचे पालक सतत त्यांच्या सभोवती असतात. कोणाचे तरी वडील किंवा कोणाची आई त्यांच्या करिअरमध्ये सतत त्यांना पाठिंबा देण्यासाठी असतात. मला तो पाठिंबा कधीच मिळाला नाही. माझी हेअरड्रेसर, माझी मेकअप आर्टिस्ट व स्पॉटबॉय हेच लोक माझ्या सुरक्षेसाठी होते. त्यामुळे मी अनेक वर्षे माझी टीम बदलली नाही.”

“प्रसादअण्णा माझे आतापर्यंत स्पॉटबॉय होते. त्यांचे निधन होईपर्यंत मी त्यांच्याबरोबर काम केले आहे. कोविडमध्ये मी त्यांना गमावले. माझ्या हेअरड्रेसरने माझ्याबरोबर १६-१७ वर्षं सलग काम केलं आहे. माझ्या पहिल्या चित्रपटापासून त्यांनी माझ्याबरोबर काम केलं आहे. ते माझी सुरक्षा करायचे. आम्हाला आमचा मार्ग शोधावा लागत असे.”

आज महिला लेखिका महिलांची पात्रे कशी समृद्धपणे कशी मांडतात, तसेच पूर्वी जेव्हा पुरुष लेखक महिलांसाठी स्क्रिप्ट लिहायचे तेव्हा काय परिस्थिती होती? त्या प्रश्नावर दिया मिर्झा म्हणाली, “मी अशी काही पात्रं साकारली आहेत, अशा काही भूमिका केल्या आहेत. त्यावेळी त्या भूमिका किंवा ती पात्रं किती प्रतिगामी आहेत, याचा विचारदेखील केला नव्हता. ते पात्र किती पुरुषसत्ताक मानसिकतेून लिहिलं गेलं आहे, याचा त्यावेळी विचार केला नव्हता. आता त्याबद्दल विचार केल्यामुळे किंवा त्याबद्दल समज आल्याने आता निवड चांगली करता येते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कामाच्या बाबतीत बोलायचे तर अभिनेत्री नुकतीच नादानियां या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.