बॉलीवूड विश्वातून एक दु:खद बातमी येत समोर आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते पार्थो घोष यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं आहे. सोमवारी सकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते हृदयविकाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी गौरी घोष आहे. पार्थो घोष यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता पार्थो घोष यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या निधनाची बातमी दिली. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता यांनी आपलं दुःख व्यक्त करत असं म्हटलं, “मी माझ्या भावना शब्दात शब्दात मांडू शकत नाही. आपण एक प्रतिभावान, दूरदर्शी आणि दयाळु दिग्दर्शक गमावला आहे. पार्थो दा, तुमच्या सिनेमांची जादू कायम स्मरणात राहील. तुमच्या आत्म्यास शांती लाभो.”
पार्थो घोष यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी १९८५ मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. १९९१ मध्ये जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित यांच्या मुख्य भुमिक असलेला ‘100 डेज’ या चित्रपटाने त्यांना मोठा ब्रेक मिळाला. ‘100 डेज’च्या यशानंतर पार्थो घोष यांनी अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती केली.
यानंतर पार्थो घोष यांनी नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ आणि मनीषा कोइराला यांची मुख्य भूमिका असलेला ‘अग्नि साक्षी’ (१९९६) हा चित्रपट केला. हा चित्रपट घरगुती हिंसाचाराच्या विषयावर आधारित सिनेमा होता. या सिनेमाचं तसंच सिनेमातील कलाकारांचं खूप कौतुकदेखील झालं. शिवाय बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा यशस्वी ठरला.
याशिवाय पार्थो घोष यांनी १५ हून अधिक चित्रपट आणले. त्यामध्ये ‘तिसरा कौन?’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘युगपुरुष’, ‘एक सेकंड… जो जिंदगी बदल दे?’ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. २०१८ मध्ये ‘मौसम इकरार के दो पल प्यार के’मधून त्यांनी वापसी केली होती. मोजक्या चित्रपटांमधूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली.
पार्थो घोष यांचे चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले नाहीत; तर त्यांनी सामाजिक मुद्द्यांवर जागरूकता पसरवण्याचं कामही केलं. त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या अजूनही हृदयात आहेत. त्यामुळे पार्थो घोष हे आज आपल्यात नसले, तरी त्यांनी केलेले सिनेमे आणि कलाकृती प्रेक्षकांच्या जीवनात कायमच जीवंत राहतील.