Priya Sachdev on Equation with Karisma Kapoor: उद्योजक संजय कपूर यांचे ५३ व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झाले. ते करिश्मा कपूरचे एक्स पती होते. करिश्मापासून घटस्फोट घेतल्यावर त्यांनी प्रिया सचदेवशी लग्न केलं होतं. या लग्नापासून त्यांना एक मुलगा आहे. काही महिन्यांपूर्वी प्रियाने एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत प्रियाने करिश्मा कपूर व तिच्या मुलांबरोबरचं तिचं नातं कसं आहे ते सांगितलं होतं.
संजय कपूर व प्रिया यांना अझारियस नावाचा एक मुलगा आहे. प्रियाचे पहिले लग्न हॉटेल व्यावसायिक विक्रम चटवालशी झालं होतं. प्रिया आणि विक्रम यांना सफिरा नावाची एक मुलगी आहे. ती प्रिया व संजयबरोबर राहते. मुलाखतीत प्रियाने संजय व त्याची दुसरी बायको करिश्मा कपूर आणि त्यांची मुलं समायरा व कियान यांच्याशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल सांगितलं.
किन अँड काइंडनेसला दिलेल्या एका मुलाखतीत प्रिया म्हणालेली, “आमच्या दोन्ही मुलीही एकमेकींच्या खूप जवळ आहेत. आमच्या धाकट्या मुलाच्या जन्मानंतर दोघी कनेक्ट झाल्या, त्यामुळे कियानही त्यांच्याशी जोडला गेला. कियान व अझारियस दोघांचं छान जमतं. माझा मुलगा अझारियस त्याच्या मोठ्या भावाचा खूप मोठा चाहता आहे. समायरा व कियान देखील विभक्त कुटुंबातून आले आहेत.”
करिश्मा कपूरबद्दल काय म्हणालेली प्रिया सचदेव?
प्रियाने तिचं व करिश्मा कपूरचं नातं कसं आहे, त्याबद्दल माहिती दिली होती. “आमचा एक फॅमिली ग्रुप आहे. आम्ही एक कपूर फॅमिली ग्रुप तयार केला आहे आणि नंतर त्यांनी त्यांच्या आईबरोबर दुसरा कपूर फॅमिली ग्रुप तयार केला आहे. मी व संजय कियान-समायराच्या आईशी बरेचदा बोलत असतो. मी तिला लोलो म्हणते, आम्ही तिला घरी चहासाठी बोलवतो. बरेचदा एकत्र डिनर करतो. तसेच फॅमिली व्हेकेशनलाही लोलो आमच्याबरोबर आली होती,” असं प्रिया सचदेव म्हणाली होती.

सर्वांना एकत्र आणण्यात मुलांची महत्त्वाची भूमिका
मुलांनी सर्वांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असं प्रियाने म्हटलं होतं. “मुलांनी मला विनंती केलीय की, ‘आईचा काहीच प्लॅन नाहीये… आपण तिला घरी बोलावू शकतो का?’ कारण आम्हाला तिला सोडून इकडे आलो, असं तिला वाटू नये. मग मी म्हणाले काहीच हरकत नाही. कारण मला माझ्या पतीबरोबरच्या माझ्या नात्याबद्दल विश्वास आहे. करिश्माही खूप चांगल्या वातावरणात आहे. तिला वाटतं की मुलांनी वडिलांबरोबर मिळून मिसळून राहावं, त्यामुळे सगळेच असुरक्षितता आणि इतर गोष्टींच्या पलीकडे गेले आहेत,” असं प्रिया म्हणाली होती.
“आता मुलं अधिक महत्त्वाची आहेत. आम्ही ठरवलंय की आपण या निष्पाप मुलांना जगात आणलं आहे आणि तर त्यांना चांगलं आयुष्य देण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांना या जगात सुरक्षित वाटायला हवं. प्रेम मिळायला हवं व कोणीतरी आपल्याला समजून घेतंय अशी भावना त्यांच्या मनात असायला हवी,” असं प्रिया म्हणाली होती.