झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. श्रेयस आणि प्रार्थना या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा म्हणजेच परी ही चिमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे यांच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी, अजित केळकर या कलाकारांमुळे मालिकेचा चार चांद लागले आहेत. पण या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेत समीरची भूमिका साकारणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे काही दिवसांसाठी मालिकेतून एक्झिट घेणार आहे. त्यामुळे पुढील काही भागात यश आणि समीरची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संकर्षण कऱ्हाडे हा ‘तू म्हणशील तसं..’ या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे. महाराष्ट्र सरकारने मनोरंजन क्षेत्रावरील निर्बंध हटवल्याने नाटक आणि चित्रपट हे थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या २३ ऑक्टोबरला संकर्षण कऱ्हाडेच्या ‘तू म्हणशील तसं…’ या नाटकाचा प्रयोग बोरिवलीतील प्रबोधन ठाकरे आणि २४ ऑक्टोबरला ठाण्यातील डॉ काशीनाथ घाणेकर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या नाटकाच्या सरावामुळे त्याला पुढील काही दिवस ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या शूटींगसाठी वेळ काढणं शक्य होणार नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांसाठी तो मालिकेतून एक्झिट घेणार आहे. त्यामुळे यश आणि समीरची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही.

या नाटकात त्याच्यासोबत अभिनेत्री भक्ती देसाई ही देखील काम करत आहे. या नाटकाचे लेखन स्वत: संकर्षणने केले असून त्याची निर्मिती प्रशांत दामले यांच्या गौरी थेटर्सच्या माध्यमातून केली जात आहे. संकर्षणने प्रशांत दामले यांना या नाटकाच्या संकल्पनेबद्दल सांगितले असता त्यांनी लगेचच त्याला होकार कळवला होता. तर या नाटकाचे दिग्दर्शन प्रसाद ओक करत आहे.

दरम्यान या नाटकाच्या दौऱ्यामुळे संकर्षण आणि भक्ती या दोघांनी अभिनय करत असलेल्या मालिकांमधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. या दौऱ्यातून जसा वेळ मिळेल तसे ते मालिकेत दिसतील, असे बोललं जात आहे.