“आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा, टा ना ना ना…” या वाक्याने अनेकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण करणारा विनोदी अभिनेता म्हणजे गौरव मोरे. छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून गौरवला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या शोमधून त्याने अनेक स्किट्सद्वारे प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले. आपल्या विनोदाच्या अनोख्या शैलीने त्याने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर गौरवने ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी विनोदी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. शिवाय मधल्या काळात त्याने काही चित्रपटांमध्येही काम केलं. अभिनयानंतर गौरवने आता दिग्दर्शक आणि निर्माता होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हंच मीडियाशी साधलेल्या संवादात त्याने येत्या काळात दिग्दर्शन आणि निर्मिती करण्याची इच्छा व्यक्त केली.

या मुलाखतीदरम्यान गौरवला स्वत:च्या निर्मिती संस्थेबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा गौरव असं म्हणाला, “मला स्वत:ची निर्मिती संस्था सुरू करायची आहे. आता ते कधी होईल? कसं होईल? याबद्दल मला माहीत नाही. पण ते डोक्यात आहे आणि करायचं तर आहेच. मीच मुख्य भूमिकेत असेन तेव्हा निर्माता म्हणून काम करेन. तसंच मला दिग्दर्शनसुद्धा करायचं आहे. चांगलं-वाईट मला माहीत नाही. पण करायचं आहे.”

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोनंतर त्याने ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये सहभाग घेतला होता. याशिवाय गौरवने ‘संगी’, ‘जयभीम पँथर’सारख्या चित्रपटात काम केलं आहे. तसंच प्रसाद ओकबरोबर त्याने ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटातही काम केलं आहे. काही दिवसांपुर्वी अभिनेता श्रेया बुगडेसह झी मराठीच्या ‘चल भावा सिटीत’ शोच्या मंचावर दिसला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामुळे गौरव पुन्हा एकदा टेलीव्हिजनवरील कार्यक्रमातून भेटीला येणार असल्याची चर्चा रंगली होती. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण त्याला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता गौरव पुन्हा कधी व कोणत्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची त्याचे चाहते वाट पाहत आहेत.