प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर हे मराठी कलाविश्वातील एक महानायकच आहेत. अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, गायक असण्याबरोबर ते उत्तम डान्सरही आहेत. वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत ते मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. केवळ मराठीच नव्हे तर हिंदीमध्येही त्यांची यशस्वी कारकीर्द सुरू आहे.
आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी मराठीसह अनेक बॉलीवूडच्या दिग्गजांबरोबर काम केलं आहे. यामध्ये बॉलीवूडचे महानायक, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नावाचाही समावेश आहे. सचिन यांनी अमिताभ यांच्याबरोबर ‘शोले’, ‘सत्ते पे सत्ता’ आणि ‘त्रिशूल’सारख्या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. त्यामुळे दोघांचे एकमेकांबरोबर खास नातं आहे. अशातच सचिन यांनी नुकतंच अमिताभ यांच्याबरोबरच्या नात्याच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला.
सचिन पिळगांवकरांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी म्हणाले, “अमिताभ आणि मी… आमचं दोघांचं नातं खुप चांगलं आहे. इतर लोक त्यांना अमितजी म्हणतात. काही लोक त्यांना बच्चन साहेब म्हणतात. मी त्यांना भाई म्हणतो.”
यानंतर सचिन पिळगांवकरांनी म्हटलं, “आमचं हे नातं ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटापासून आहे. त्याआधी आम्ही ‘शोले’मध्ये एकत्र होतो. त्यानंतर ‘त्रिशूल’मध्ये सुद्धा होतो. पण ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटामुळे आमच्यात एक वेगळंच नातं तयार झालं. पण मी अमिताभ यांच्यापेक्षा जया बच्चन यांच्या अधिक जवळ आहे. त्यांच्याबरोबर मी तसं एकाही चित्रपटात काम केलेलं नाही. पण त्या माझ्याशी खूप गोड वागतात.”
यापुढे सचिन पिळगांवकर म्हणतात, “जयाजी माझे खूप लाड करतात आणि बहुतेक काही वेळेस ते अमितजींना आवडत नाही. कधी कधी ते म्हणतात ‘ये जया के दहेज में आया है’. त्यांना कदाचित असं वाटतं की, तो हिच्या अधिक जवळ का आहे? माझ्या का नाही? पण ठीक आहे. एकमेकांबरोबरचं नातं असतं.”
यानंतर सचिन पिळगांवकरांनी सांगितलं, “अमिताभजी आणि मी… आम्ही एकत्र चित्रपट केले; पण त्यांच्याबरोबर एवढी जवळीक नाही झाली, जी जया यांच्याबरोबर एकदाही काम न करता आहे. पण आम्ही सगळे एकत्रच आहोत. आम्ही कुठे एकमेकांशी दूर आहोत असं काही नाही.”