Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायली आणि अर्जुन आश्रम केससंदर्भातील पुरावे शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. विलासचा खून झाल्यावर महिपतने या केससंदर्भातील सगळे पुरावे नष्ट केलेले असतात. मात्र, नव्याने तपास केल्यावर अर्जुनला आश्रमात पेडंटचा अर्धा तुकडा सापडलेला असतो.
आश्रमात सापडलेला पेडंटचा तुकडा साक्षी शिखरेचा असणार याची अर्जुनला शंभर टक्के खात्री असते. त्यामुळे काही करून साक्षी-महिपतच्या घरी जाऊन या पेडंटचा उरलेला अर्धा तुकडा शोधला पाहिजे असं अर्जुन ठरवतो. यासाठी सायली वेश बदलून साक्षी शिखरेच्या घरी सुद्धा जाते.
सायली पार्लरचं काम करण्यासाठी साक्षीच्या घरी जाते. पण, साक्षीला संशय येण्याच्या आधी ती तिथून काढता पाय घेते. आता महिपत आणि साक्षीच्या घरी पुन्हा एकदा कसं जायचं असा विचार अर्जुन करत असतो. एवढ्यात शहरातील एका बिझनेस कार्यक्रमात सगळ्या मान्यवरांना आमंत्रित केल्याचं अर्जुनला त्याच्या वडिलांकडून समजतं. हीच संधी साधून आपण महिपतच्या घरी जाऊयात असं तो बायकोला सांगतो.
सायली-अर्जुनला या कामात चैतन्य देखील मदत करत असतो. साक्षीच्या खोलीत शोधाशोध केल्यावर अखेर २ वर्षांनी अर्जुनला आश्रम केससंदर्भातील मोठा पुरावा सापडणार आहे.
साक्षीच्या घरी शोधाशोध केल्यावर या दोघांना तिचं अर्ध पेडंट सापडतं. अर्जुन आणि सायली दोन्ही तुकडे जुळवतात, ज्यामुळे S अक्षर तयार होतं. पेडंट हाती लागल्यावर अर्जुन प्रचंड खूश होतं. या दोघांची २ वर्षांची मेहनत सार्थकी लागते.
पेडंट हाती लागताच अर्जुन बायकोला म्हणतो, “आपली २ वर्षांची मेहनत फळाला आली. आता पिछेहाट नाही, आता वेळ आहे निकालाची…” अर्जुनच्या हाती पुरावा लागल्यामुळे ‘ठरलं तर मग’ मालिकेत पुन्हा एकदा कोर्टरुम ड्रामा सुरू होणार आहे.
आता कोर्टात गेल्यावर नेमकं काय घडणार? साक्षीला अर्जुन कसा अडकवणार? या पुराव्याची हिंट प्रियाला मिळेल का? या सगळ्या गोष्टी मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, हा विशेष भाग ३० जूनला रात्री ८:३० वाजता प्रसारित केला जाईल.