बॉलिवूडमधील बहुचर्चित ठरलेला अभिनेता वरूण धवन आणि नताशा दलाल यांचा विवाहसोहळा २४ जानेवारी रोजी संपन्न झाला. नताशा ही वरूणची लहानपणापासूनची मैत्रिण होती. दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये असल्यानंतर त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर तब्बल तीन दिवसांनी वरूणने पहिलं ट्वीट केलं.

वरूणने ट्वीट करत सगळ्या चाहत्यांचे आभार मानले. “गेल्या काही दिवसांपासून मला आणि नताशाला प्रत्येकाकडून खूप प्रेम मिळाले. म्हणून मी मनापासून तुमचे आभार मानतो.”, अशा आशयाचं ट्वीट वरूणने केले आहे. या ट्वीटनंतर लगेच वरुणने त्याच्या लग्नाची तयारी करणाऱ्या वेडिंग प्लॅनर कंपनीच्या टीमसोबत फोटो शेअर करत त्यांचेही आभार मानले आहे. “हे घडवून आणल्याबद्दल धन्यवाद”, असं वरूणने त्या ट्वीटमध्ये लिहिलं.

वरूण आणि नताशा यांचा लग्नसोहळा अलिबाग येथील द मेन्शन हाऊस येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. यात करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, अनिल कपूर, जान्हवी कपूर असे बॉलिवूडमधील स्टारमंडळी सहभागी झाली होती.