सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने आज मुंबईमधील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंदर्भातील प्रकरणामध्ये या धाडी टाकण्यात आल्यात. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एक मंत्रीही या प्रकरणात सहभागी असल्याची ईडीला शंका आहे. हवाला प्रकरणी या मंत्र्यांची ईडीकडून चौकशीही करण्यात आली आहे.

१९८० च्या दशकामध्ये भारतसोडून पळ काढणाऱ्या दाऊद इब्राहिम परदेशात बसून देशामध्ये मोठे आर्थिक व्यवहार करतो असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. मुंबईमधील डी कंपनीचा संबंध पंजाबपर्यंत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. या पंजाब कनेक्शनमुळे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून अंडरवर्ल्डचा वापर पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

या महिन्याच्या सुरुवातीलाच तपास यंत्रणांनी अबू बकारला अटक केलीय. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असणारा अबू तब्बल २९ वर्षानंतर यंत्रणांच्या हाती लागला असून तो दाऊदचा जवळचा सहकारी आहे. अबूला संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईमधून अटक करण्यात आलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई पोलीस खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा असणारा दाऊत इब्राहिमने डोंगरीमधून आपल्या गुन्हेगारी क्षेत्रातील हलचालींना सुरुवात केली. डोंगरीमध्ये त्याची ओळख हाजी मस्तानच्या गँगशी झाली आणि तिथूनच मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील गँग वॉरचा कालावधी सुरु झाला. १९८० दरम्यान दाऊदला एका चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेली. नंतर त्याच्यावरील गुन्ह्यांची संख्या वाढतच गेली. हाजी मस्तान आणि पठाण गँगदरम्यानच्या वादामुळे दिवसोंदिवस दाऊद अधिक धोकादायक झाला. पठाण गँगमध्ये प्रामुख्याने अफगाणिस्तानमधून आलेल्या लोकांचा समावेश होता. नंतर याच गँगवॉरमधून आणि वादामधून मुंबईवर आपली दहशत निर्माण व्हावी या हेतूने दाऊदने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले.