‘वीज चोरून वापरू नका, कायदेशीर मीटर बसवूनच विजेचा वापरा करा’ असे आवाहन वारंवार बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत आहे. मात्र असे असले तरीही मुंबई मोठ्या प्रमाणावर विजेची चोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बेस्टच्या विद्युतपुरवठा विभागातील दक्षता पथकाने गेल्या ११ वर्षांमध्ये विजेची चोरी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करून तब्बल १०५ कोटी ३६ लाख ५४ हजार रुपयांची वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. याप्रकरणी सात हजार ८६७ जणांना अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>अब्दुल सत्तांराविरोधात राष्ट्रवादीचा मंत्रालयावर मोर्चा; महिला कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट

बेस्टचा विद्युतपुरवठा विभाग परिवहन विभागाच्या तुलनेत नफ्यात होता. सध्या हा विभाग विविध कारणामुळे तोट्यात जाऊ लागला आहे. विद्युतपुरवठा विभागाला वीज चोरीचा मोठा फटका बसत आहे. छोटे-मोठे उद्योगधंदे, तसेच घरगुती वीज वापरकर्त्यांकडून मीटरमध्ये फेरफार केरण्यात आल्याचे आढळले आहे. तर अनधिकृत झोपडपट्यांमध्येही अवैध जोडणी करून विजेचा वापर करण्यात येत आहे. मोहम्मद अली रोड, सारंग स्ट्रीट, कोळसा स्ट्रीट, सरदार वल्लभाई पटेल रोड, नौरोजी हिल रोड यांसह मुंबईतील विविध भागात अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथांवरच बस्तान मांडले असून यापैकी बहुसंख्य फेरीवाले अनधिकृतपणे विजेचा वापर करीत आहेत. मीटरचा वेग कमी करणे, मीटरशिवाय थेट विद्युतपुरवठा घेऊन वीज चोरी करण्यात येत आहे. या वीज चोरांविरूद्ध बेस्टच्या विद्युतपुरवठा विभागातील दक्षता पथकाकडून कारवाई करण्यात येते.

हेही वाचा >>>मुंबई: कचराभूमी आणि जैववैद्यकीय प्रकल्पामुळे गोवंडीत गोवरचा उद्रेक?

२०१२-१३ पासून ते आतापर्यंत एकूण १०५ कोटी ३६ लाख ५४ हजार रुपयांच्या वीज चोरी प्रकरणांचा छडा लावण्यात बेस्टला यश आले आहे. या संदर्भात १७ हजार २३५ प्रकरणे दाखल झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी एक हजार ३३९ गुन्हे दाखल झाले असून सात हजार ८६७ आरोपींना अटक करण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. वीज चोरांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येते. वीज चोरी करण्याऐवजी ती योग्य प्रकारे घेऊन वापरावी, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून वारंवार करण्यात येत आहे. त्याचबरोबर व्यापारी आणि घरगुती वीज वापरकर्त्यांना देणाऱ्या सवलतींची माहितीही देण्यात येत आहे. परिणामी, वीज चोरीचे प्रकार काही प्रमाणात कमी झाल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>>अब्दुल सत्तांराविरोधात राष्ट्रवादीचा मंत्रालयावर मोर्चा; महिला कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट

महसूल बुडाला

वीज चोरीच्या प्रकारांमुळे बेस्ट उपक्रमाचा महसुलही बुडतो. हा बुडालेला महसुल वीज चोरांकडून दंडाच्या स्वरुपात वसूल करण्यात येतो. गेल्या ११ वर्षांमध्ये १०५ कोटी ३६ लाख ५४ हजार रुपयांची वीजचोरी झाली असून यापैकी ८२ कोटी २७ लाख ८९ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.
२०१२-१३ या वर्षात एक हजार ९२४ वीज चोरीची प्रकरणे दाखल झाली होती. याप्रकरणी ५८९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या वर्षात ११ कोटी ८६ लाख १० हजार रुपयांची वीज चोरी झाली असून सहा कोटी ८५ लाख १० हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. २०२१-२२ मध्ये वीज चोरीच्या एक हजार २७६ प्रकरणांमध्ये ६३२ आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणांमध्ये एकूण आठ कोटी रुपयांची वीज चोरी झाली आहे. यापैकी पाच कोटी ३४ लाख ९९ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. एप्रिल २०२२ – सप्टेंबर २३ मध्ये ९२५ प्रकरणात ४३४ जणांना अटक करण्यात आली आहे. या वर्षात पाच कोटी २१ लाख २४ हजार रुपयांची वीज चोरी झाली असून तीन कोटी ४३ लाख ५७ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity theft in mumbai thieves arrested by best mumbai print news amy
First published on: 15-11-2022 at 16:18 IST