मुंबई : यंदा मे महिन्यात संपूर्ण राज्यात पावसाने अपेक्षापेक्षा जास्त हजेरी लावली असून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात सार्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार १ ते ३१ मे या कालावधीत सिंधुदुर्गमध्ये ५६४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार अनेक भागात मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते अगदी मोसमी पाऊस दाखल होईपर्यंत वळवाचा पाऊस कोसळत होता. मे महिन्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र पश्चिमी चक्रावातांचा मध्य भारतापर्यंत पडलेला प्रभाव, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणावर झालेला बाष्पाचा पुरवठा आणि समुद्रामध्ये निर्माण झालेले कमी दाब प्रणालीमुळे राज्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कमाल तापमानातही घट झाली होती. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र कोकणातून मध्य महाराष्ट्र ते मराठवाड्यापर्यंत पोहोचल्याने मे महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे अनेक भागात २४ तासांतच विक्रमी पावसाची नोंद देखील झालेली आहे.
दरम्यान, पूर्वमोसमी हंगमात (मार्च ते मे) राज्यात सरासरी १७३ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत राज्यात साधारणपणे सरासरी २६.२ मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदा राज्यात मे महिन्यात साडे सहा पट अधिक पावसाची नोंद झाली.
कुठे किती पाऊस?
यंदा १ ते ३१ मे या कालावधीत सर्वाधिक पाऊस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदवला गेला आहे. तेथे ५६४.७ मिमी पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल रत्नागिरी येथे ५५७.६ मिमी पाऊस नोंदला गेला. बुलढाणा येथे १८७.४ मिमी, रायगड ४५९.४ मिमी, ठाणे १६९.९ मिमी, अहिल्यानगर १४९.९ मिमी, धुळे ८५.१ मिमी, जळगाव १३.१ मिमी, कोल्हापूर २१३.४ मिमी, नंदूरबार ५२.२ मिमी, नाशिक ९८.४ मिमी, पुणे २६१.४ मिमी, सांगली १३९.९ मिमी, सातारा २३०.५ मिमी, सोलापूर ११५.९ मिमी, बीड १९९ मिमी, छत्रपती संभाजीनगर ६२.७ मिमी, धाराशिव २४४.९ मिमी, हिंगोली ९.२० मिमी, चंद्रपूर ६१.९ मिमी, गडचिरोली १९६.५ मिमी, गोंदिया १३७ मिमी, नागपूर १०४.२ मिमी, वर्धा १२५.१ मिमी, वाशीम ११८.४ मिमी तर यवतमाळ येथे ६१.९ मिमी पावसाची नोंद झाली.