मुंबई : मागील अनेक दिवसांपासून प्रवास मंदावलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी अखेर आगेकूच केली. संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मोसमी पावसाने व्यापला आहे. तर, विदर्भातील बहुतांश भाग मोसमी पावसाने व्यापला. दरम्यान, मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे.

यंदा मोसमी पाऊस लवकर म्हणजेच २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातही मोसमी वाऱ्यांनी आगेकूच केली. केरळच्या बहुतेक भागासह उत्तर कर्नाटकातील कारवारपर्यंत मोसमी वारे धडकले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २५ मे रोजी मोसमी पावसाचे राज्यात म्हणजेच, देवगड तसेच कर्नाटक आणि संपूर्ण गोव्यात आगमन झाले.

लगेचच दुसऱ्या दिवशी मोसमी पाऊस मुंबईत दाखल झाला. मात्र २६ मेनंतर मोसमी वाऱ्यांचा प्रवास मंदावला होता. मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागात दाखल झाल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली होती. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण नव्हती. त्यानंतर साधारण २० दिवसांनी म्हणजेच सोमवारी मोसमी वाऱ्यांनी आगेकूच केली.

मोसमी पावसाने सोमवारी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापला असून विदर्भाच्या काही भागात प्रगती केली आहे. याचबरोबर सौराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात मोसमी पावसाने प्रगती केली आहे. दरम्यान, अजूनही मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. विदर्भातील काही भागात मोसमी पावसाची प्रतीक्षा आहे. मोसमी वाऱ्यांची सीमा सोमवारी गुजरातमधील वेरावल, भावनगर आणि वडोदरा, तर मध्य प्रदेशातील खरगोन, महाराष्ट्रातील विदर्भ, छत्तीसगडमधील दूर्ग, ओडिशातील बारगर आणि चांदबली तसेच पश्चिम बंगालमधील बालूरघाट भागात होती. दरम्यान, मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्याने मोसमी पाऊस पुढील एक दोन दिवसांत विदर्भाचा उरलेला भाग व्यापेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच छत्तीसगड, ओडिशा, गुजरात आणि मध्य प्रदेशतील आणखी काही भागात पाऊस दाखल होईल.

पुढील दोन दिवसांत मोसमी पाऊस पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंडचा काही भाग, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. परिणामी पावसाचा जोर वाढलेला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. राज्यातील काही भागात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि पुणे भागात मंगळवारपासून गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.