मुंबई : यंदा मोसमी पावसाला लवकर सुरूवात झाली असून मुंबईसह राज्यात पावसाने जोर धरला आहे. मात्र असे असले तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सध्या एकूण १२.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या आठवड्यात पाऊस पडून मुंबईचे रस्ते जलमय झाले, तरी धरणातील पाणीसाठा मात्र खालावतच आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असून सध्या सातही धरणांत एकूण १२.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. त्या तुलनेत सध्या सात धरणांत १ लाख ७५ हजार ७२८ दशलक्ष लीटर पाणीसाठा आहे. सात धरणांपैकी मुंबईच्या हद्दीतील विहार आणि तुळशी या धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली असून ही मागणी मान्य झाली आहे. धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस सुरू झाला नाही तर मुंबई महापालिकेला या राखीव साठ्याचा वापर करावा लागणार आहे.

गेल्यावर्षीही उन्हाळ्यात राखीव साठ्याचा वापर करण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली होती. जून २०२४ मध्ये पाणीसाठा ५ टक्क्यांपर्यंत खालावला होता. तेव्हा राखीव साठ्याचा वापर सुरू करण्यात आला होता. तशीच स्थिती यंदाही येऊ शकते. त्यामुळे मुंबई महापालिकेने आधीच राज्य सरकारला पत्र पाठवून उर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लीटर, तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लीटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी नोंदवली आहे.

राखीव साठ्यासाठी मोबदला द्यावा लागणार

राखीव साठ्याचे पाणी घेतले तरी त्यासाठीचा मोबदला मुंबई महानगरपालिका प्रशासनाला राज्य सरकारकडे जमा करावा लागणार आहे. जेवढे पाणी वापरले त्या तुलनेत हा मोबदला द्यावा लागतो. गेल्यावर्षी जून २०२४ मध्ये पाणीसाठा ५ टक्क्यांपर्यंत खालावला होता. तेव्हा राखीव साठ्याचा वापर सुरू करण्यात आला होता. गेल्यावर्षी भातसा धरणातून १ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर, तर उर्ध्व वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लीटर राखीव साठ्यातील पाण्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी उर्ध्व वैतरणा धरणातून ४८,४२० पाणी वापरण्यात आले होते. त्याबदल्यात ३९.४३ कोटी रुपये मुंबई महापालिका प्रशासनाने राज्य सरकारला दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे यंदाही किती वापर होईल त्यानुसार पाण्याचा खर्च द्यावा लागणार आहे.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा

उर्ध्व वैतरणा – ५.१७ टक्के

मोडक सागर – ३०.४१ टक्के

तानसा – ११.८७ टक्के

मध्य वैतरणा – १३.६४ टक्के

भातसा – ९.७४ टक्के

विहार – ३२.०१टक्के

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुळशी- ३०.७८टक्के