मुंबई : संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही शुक्रवारी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. दरम्यान, मुंबईसह ठाणे भागात शनिवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यातील इतर भागातही पुढील तीन ते चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत मोसमी वारे वाटचाल करतील. या कालावधीत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात गुरुवारपासून पाऊस सुरु होईल असे पूर्वानुमान हवामान विभगााने वर्तवले होते. त्यानुसार गुरुवारी मुंबईसह राज्यातील इतर भागात पाऊस पडला. मुंबईत गुरुवारी मध्यरात्री पावसाचा जोर होता. दादर, परळ, वरळी, प्रभादेवी परिसरात साधारण एक तास पाऊस कोसळत होता. त्यानंतर शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ५ वाजल्यानंतर पावसाने जोर धरला नरिमन पॉइंट, वरळी, दादर, परळ या परिसरात पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत १.२ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात ०.७ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी फारसा पाऊस पडला नसल्यामुळे पावसाची नोंद कमी झाली असली तरी, दिवसभर ढगाळ वातावरणामुळे तसेच अधूनमधून बरसणाऱ्या हलक्या सरींमुळे तापमानात घट झाली होती. कुलाबा येथे ३० अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे ३१.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यामुळे दिवसभर वातावरणात गारवा निर्माण होऊन मुंबईकारंना उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली होती. काहीवेळा अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. दरम्यान, मुंबईसह ठाणे परिसरात शनिवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्र आमि मराठवाडा भागातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
विदर्भात मोसमी वाऱ्यांची वाटचाल शक्य
बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक वातावरण असल्याने विदर्भासह, छत्तीसगड आणि ओडिशा राज्यांच्या काही भागात मोसमी वाऱ्यांची वाटचाल होण्याची शक्यता हवामान विभगाने वर्तविली आहे. मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रातील मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या काही भागात २६ मे रोजी वाटचाल केल्यानंतर मोसमी वाऱ्यांचा प्रवास मंदावला आहे. मोसमी वाऱ्यांची सीमा शुक्रवारीही एकाच जागी होती.