Mumbai Train Accident मुंबईतल्या मुंब्रा या स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती त्यामुळे दरवाजाला लटकून प्रवास करत होते. दुसरी लोकल कल्याणच्या दिशेने जात होती. या लोकलमुळे दरवाजात लटकून उभ्या असलेल्या प्रवाशांना धक्का लागला आणि ते खाली पडले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांनीच शोक व्यक्त केला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून परिस्थिती जैसे थेच आहे. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या अपघातांवर नजर टाकली तर हेच लक्षात येतं.
अवधेशचा एप्रिल २०२५ मध्ये अपघाती मृत्यू
एप्रिल २०२५ मध्ये २५ वर्षांचा आयआयटीचा विद्यार्थी अवधेश दुबे हा एमबीएसाठी तयारी करत होता. मुंबईत गर्दी असलेल्या लोकलणध्ये तो शिरला. सकाळची वेळ असल्याने मुंबई लोकलमध्ये तोबा गर्दी या शब्दाला लाजवेल इतकी गर्दी होती. त्यातही कळवा ते ठाणे दरम्यान ट्रेन उभी होती. अवधेशचं कुटुंब दरवाजापाशी अडकलं होतं. या ठिकाणीच अपघात झाला आणि अवधेशचा मृत्यू झाला. अवधेशचे वडील आजही न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आजही गर्दी तशीच आहे.
२०२४ मध्ये २४६८ प्रवाशांना गमवावे लागले प्राण
अवधेशच्या अपघाती मृत्यूप्रमाणेच अनेक घटना समोर आल्या आहेत. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीत रोज सरासरी सात ते आठ अपघात होता. गर्दीतून पडणे, अपघात आणि इतर घटना यांची रोजची संख्या हीच आहे. २०२४ या एका वर्षात २४६८ प्रवाशांना त्यांचे प्राण गमावावे लागले. मागच्या २० वर्षांची आकडेवारी पाहिली तर ५० हजारांहून अधिक लोकांचा जीव रेल्वे प्रवास करताना गेला आहे. मुंबईकर जीव मुठीत धरुन प्रवास करतात हे सांगितलं जातं ते का? याचा प्रत्यय या आकडेवारीतून येतोच.
मध्य आणि पश्चिम रेल्वेची आकडेवारी काय सांगते?
२००५ ते २०२४ या कालावधीत २२ हजार ४८१ प्रवाशांचा लोकल प्रवासादरम्यान अपघात होऊन मृत्यू झाला आहे. तर २००९ ते २०२४ या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावर २९ हजार ३२१ प्रवाशांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. मागील दोन वर्षांची मृतांची आकडेवारी लक्षात घेतली तर त्यांचे सर्वाधिक अपघात ठाणे, कल्याण, वसई आणि बोरिवली या स्टेशनांच्या दरम्यान झाले आहेत. लोकलच्या डब्यांची संख्या वाढवली जात नसल्याने आणि प्लॅटफॉर्मच्या तशा सोयी नसल्याने गर्दी वाढत चालली आहे. मात्र ढिम्म रेल्वे प्रशासन यावर काहीही उपाय योजना करण्यास तयार नाही. मिड डे ने हे वृत्त दिलं आहे.
मध्य रेल्वेने २०२३ मध्ये काय केलं?
ऑक्टोबर २०२३ मध्ये मध्य रेल्वेने विविध आस्थापना, संस्था यांना कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळा शिफ्टमध्ये ठेवा अशी विनंती करणारं पत्र पाठवलं होतं. त्यांनी साधारण ३५० हून अधिक संस्थांना, कार्यालयांना या संदर्भातली पत्र पाठवली. तरीही परिस्थिती बदलेली नाही. मागील सात वर्षांत मध्य रेल्वेवर लोकलच्या १५० फेऱ्या वाढल्या तरीही काही उपयोग झालेला नाही. कारण प्रवाशांची संख्या रोजच्या रोज वाढतेच आहे. गर्दीचा वेळा म्हणजे पिक अवर्स संपवण्यासाठी उपाय योजना कराव्यात अशी पत्रं पाठवून काहीही विशेष घडलेलं नाही हे वास्तव आहे.