मुंबई: ठाणे-भिवंडी- कल्याण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी विशेषत: भिवंडी शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या परिवहन सेवेच्या गरजा भागविण्यासाठी ठाणे-कल्याण- भिवंडी मेट्रो मार्ग भूमिगत करण्याचा तसेच या भागात नव्याने उड्डाणपूल बांधण्याचा स्वतंत्र प्रकल्प राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतला.

ठाणे-कल्याण- भिवंडी मेट्रो मार्ग क्रमांक ५ च्या आढावा बैठकीत फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर केला. कल्याण – भिवंडी मेट्रो लाईन प्रकल्प राबविण्यात येत आहे. भिवंडी शहरात वाढती लोकसंख्या, मालवाहतूकदारांची मोठी संख्या यामुळे कायमच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याकरीता आणि शहराच्या सर्वांगीण, वेगवान पायाभूत विकासासाठी भूमीगत मेट्रोसह रस्ता रूंदीकरण व नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबविण्याचा निर्णय ठाणे-कल्याण- भिवंडी मेट्रो मार्ग क्रमांक ५ च्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

बैठकीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, भिवंडी- निजामपूर महानगरपालिका आयुक्त अमोल सागर, कल्याण -डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या मेट्रो मार्गिका-५ प्रकल्पांच्या माध्यमातून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर परिसरातील लाखो नागरिकांना जलद, सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. विकसनशील शहरे आणि औद्योगिक केंद्रे यांच्यासाठी सार्वजनिक वाहतूक व रस्ते ही दोन्ही माध्यमे परस्परपूरक असून त्यांची अंमलबजावणी समांतर पद्धतीने केल्यास विकासाची गती वाढेल. नागरिकांना अधिक फायदेशीर सेवा मिळू शकणार आहे. मेट्रोचे काम करताना ‘डिप टनेल’ तंत्रज्ञान वापरून बोगदा तयार करण्याच्या कामाची पडताळणी करावी. तसेच दुहेरी बोगदा तंत्रज्ञान वापरून रस्ता व मेट्रो मार्ग तयार करण्याच्या कामाचाही अभ्यास करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

या प्रकल्पांमुळे भिवंडी शहरातील दळणावळणाला गती येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, या भागातील औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा विस्तार आता कल्याणच्या पुढे उल्हासनगरपर्यंत होत आहे. उल्हासनगरच्यापुढे अंबरनाथ जवळील चिखलोली उपनगरीय रेल्वे स्थानकापर्यंत विस्तार करण्याबाबत अभ्यास करण्यात येत आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि आजूबाजूच्या परिसरातील लाखो रहिवाशांना मुंबई आणि ठाणे या प्रमुख शहरी केंद्रांपर्यंतचा प्रवास अधिक जलद होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्याने हाती घेण्यात येत असलेल्या पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पांमुळे भिवंडी शहराच्या विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पांसाठी सरकार निधी उपलब्ध करून देईल. भिवंडी शहरात मेट्रोच्या कामासोबतच रस्ता रूंदीकरण प्रकल्पाचे कामही सुरू करण्यात यावे. शहरातील नागरिकांची या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर वाहतूक कोंडीच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका होणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांचे काम सोबतच सुरू करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या. रस्ता रूंदीकरण प्रकल्प राबविल्यामुळे भिवंडी शहरातील उत्तर भागाचा सर्वांगीण विकास होणार असून या भागातील नागरिकांचे दळण वळण गतीमान होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.