Mumbai Auto-Rickshaw driver Story : मुंबईतील रिक्षाचालक दिवसाला साधारण किती रुपये कमवत असतील? त्यांचं मासिक आणि वार्षिक उत्पन्न किती असेल? रिक्षा चालवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह नीट होत असेल का? असा प्रश्न सामान्य माणसांनाही अनेकदा पडतो. परिसरानुसार रिक्षाचालकांचं उत्पन्न ठरतं. पण तुम्हाला कोणी सांगितलं की एखादा रिक्षाचालक दिवसाला २० ते ३० हजार आणि महिन्याला ५ ते ८ लाख रुपये कमावतो तर तुम्हाला खरं वाटेल का? पण हे खरं आहे. मुंबईतील एक रिक्षाचालक दिवसाला जवळपास ३० हजार रुपये कमावतो. पण त्याचं कमावण्याचं माध्यम जरा वेगळं आहे. लिंक्डइनवर शेअर झालेल्या पोस्टनंतर हा रिक्षाचालक चर्चेत आला आहे.
रिक्षाचालकाचा नेमका व्यवसाय काय?
आयटी प्रोफेनशल्स किंवा चार्टर्ड अकाऊंट यांच्या उत्पन्नालाही लाजवेल असं या रिक्षाचालकाचं उत्पन्न आहे. लेन्सकार्टचे उत्पादन प्रमुख आणि अनुभवी उद्योजक राहुल रुपाणी यांनी यासंदर्भातील पोस्ट लिंक्डइनवर शेअर केली आहे. मुंबईतील रिक्षाचालक दिवसाला इतके रुपये कमावतो हे वाचूनच अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रिक्षा चालवून दिवसाला इतकं उत्पन्न कसं होऊ शकतं? तर याचं उत्तर असं आहे की संबंधित व्यक्ती रिक्षाचालक असली तरीही ते रिक्षा न चालवता एवढे पैसे कमावत आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कमाईसाठी ते कोणताही ॲप किंवा ऑनलाईन माध्यम वापरत नाहीत. फक्त ते त्यांच्या रिक्षाचा लॉकर स्पेस म्हणून वापर करत आहेत.
दिवसाला २० ते ३० हजारांची कमाई
कमावण्याची इर्ष्या असली की हुशार माणूस कोणत्याही माध्यमातून रग्गड पैसे कमावू शकतो. फक्त त्याकरता इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची क्षमता हवी. संबंधित रिक्षाचालक अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाबाहेर त्याची रिक्षा लावतो. तिथे व्हिसा अपॉइंटमेंटसाठी येणाऱ्या लोकांना तो मदत करतो. सुरक्षा नियमांनुसार वाणिज्य दूतावासाच्या आवारात बॅगा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे. लोकांची हीच समस्या लक्षात घेऊन या रिक्षाचालकाने वाणिज्य दूतावासाबाहेर गाडी उभी केली आणि या कार्यालयात येणाऱ्यांच्या बॅगा सांभाळण्याचं काम सुरू केलं. या बॅगा सांभाळण्याकरता प्रत्येकाकडून हजार रुपये घेतले जातात. दिवसाला जवळपास २० ते ३० ग्राहकांनी त्याच्याकडे बॅगा ठेवल्या तरी रिक्षाचालक २० ते ३० हजार रुपये कमावतो. म्हणजेच महिन्याला तब्बल ५ ते ८ लाख रुपये कमावले जातात.
ही पोस्ट करताना रुपाणी यांनी या कल्पनेला मास्टरक्लास म्हटलं आहे. अॅप्स, निधी किंवा व्यवसाय पदवीशिवाय हे साध्य केल्याने रुपाणी यांना त्याचं कौतुक आहे. “ही खरी उद्योजकता आहे. फक्त पार्किंगची जागा आणि निव्वळ गर्दी”, असं रूपाणी पुढे म्हणाले.
या पोस्टवर एकाने अत्यंत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणजे, “नाविन्य नेहमीच सुटाबुटात नसतं तर ते गणवेश घालून दूतावासाबाहेरही उभं असतं.”