मुंबई : मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी झालेल्या अपघाताची रेल्वे पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे. हा अपघात नेमका कसा झाला, असे अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करावी या अनुषंगाने ही चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी मंगळवारीपासून जखमी प्रवाशांचे जबाब नोंदविण्यास सुरवात केली आहे.दिवा – मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळी दोन लोकल ट्रेनचा विचित्र अपघात झाला.
दोन लोकल रुळांवर समांतर आल्या आणि दोन्ही रेल्वेच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणारे प्रवासी खाली पडले. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला. गर्दीच्या वेळी लोकलमधून खाली पडून प्रवासी मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत असतात. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारचा विचित्र अपघात झाला. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करण्याचा निर्णय रेल्वे पोलिसांनी घेतला आहे. कुठल्या ट्रेनमधून किती प्रवासी पडले, नेमके काय घडले हे रेल्वे पोलीस जाणून घेणार आहेत. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचे जबाब रेल्वे पोलिसांनी नोंदविण्यास सुरवात केली आहे. याशिवाय प्रत्यक्षदर्शीचेही जबाब नोंदविले जाणार आहेत. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी काय उपाययोजना करता येईल हे या चौकशीतून शोधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी सांगितले. सर्वसाधारण लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सर्वसाधारण लोकल ट्रेनला स्वंयचिल दरवाजे बसवले तर अपघात टळतील. प्रवाशांना याची सवय नाही. मात्र कालांतराने त्याची सवय होईल, असेही कलासागर यांनी सांगितले.
लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईलगतची वसई – विरारपासून कल्याण, कर्जत आदी शहरे विकसित होत आहेत. परराज्यातून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कामानिमित्ताने श्रमिक, नोकरदार मुंबईला येत असतात. तो सर्व ताण रेल्वेवर येत असतो. दररोज गर्दीच्या वेळी ट्रेनमधून प्रवासी खाली पडतात. परंतु प्रथमच दोन ट्रेनमधील प्रवासी एकमेकांचा धक्का लागून खाली पडण्याची घटना घडली आहे. त्यादृष्टीने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता रेल्वे पोलीस उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.