मुंबई : देशातील ‘रिपाइं’च्या ऐक्यासाठी व दलित एकजुटीसाठी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व ‘बसप’ अध्यक्षा मायावती यांनी ‘रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया’चे नेतृत्व करावे, असे आवाहन ‘रिपाइं’ अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

‘रिपाइं’चे राज्यात अनेक गट आहेत. पैकी आठवले यांचा ‘ए’ नावाचा ‘रिपाइं’ गट आहे. आठवले हे राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत. आपण भाजपच्या महायुतीमध्ये आहोत, असा त्यांचा दावा आहे. डिसेंबर मध्ये राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आठवले यांच्या ‘रिपाइं’ला एक जागा सोडली होती. ती सुुद्धा भाजप चिन्हावर लढण्याची अट होती. आठवले यांच्या ‘रिपाइं’चा राज्यात आमदार-खासदार नाही. त्याच आठवले यांनी उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती यांना ‘रिपाइं’चे नेतृत्वाचे आवाहन केले आहे.

‘मायावती यांचा ‘बहुजन समाज पक्ष’ शेवटच्या घटका मोजतो आहे. ‘बसप’चा तेथे एक आमदार आणि एक खासदार आहे. ‘रिपाइं’ -ए गट हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा खराखुरा राजकीय पक्ष आहे. मायावती यांचा करिष्मा आता राहिलेला नाही. मायावती यांनी ‘रिपाइं’चे नेतृत्व केल्यास अनेक वर्षापासून होत नसलेले ‘रिपाइं’ गटांचे ऐक्य घडून येईल. देशातील दलितांची एकजुट करण्यासाठी अनुभवी असलेल्या मायावती यांनी पुढे यावे, असे आठवले यांचे म्हणणे आहे.