मुंबई : कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगलीत पूर येतो की नाही, याचा अभ्यास करण्यास आयआयटी रुरकी ला सांगण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच राज्य सरकार अलमट्टी बाबत अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे जलसपंदा विभागाने या बाबत कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.
कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगलीत पूर येतो की नाही, या बाबत राज्य सरकारच्या पातळीवरच गोंधळ आहे. वडनेरे समिती एक आणि दोन, केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्रासह जलसंपदाच्या अनेक अधिकाऱ्यांनी अलमट्टी आणि पुराचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. पण, स्थानिक राजकीय नेते अलमट्टीमुळेच पूर येत असल्याचे ठासून सांगत आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाची कोंडी झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, असे पत्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. दुसरीकडे सर्वपक्षीय संघर्ष समितीने सांगली, कोल्हापुरात आंदोलन करून रान उठवले आहे. तरीही केंद्र सरकारसमोर आणि सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने भूमिका मांडण्यात अडचणी येत आहेत.
समित्यांच्या अहवालात काय
वडनेरे समितीने अलमट्टी आणि पुराचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले असले तरीही राज्य सरकारने वडनेरे समितीचा अहवाल अंशताः स्विकारला आहे. शिवाय अन्य कोणत्याही समितीने अलमट्टी आणि पुराचा संबंध आहे, असे म्हटलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारला धोरण ठरविण्यात अडचणी येत आहेत. तसेच अलमट्टीच्या उंची वाढीला विरोध करण्यासाठी ठोस आकडेवारी आणि पुरावेही सरकारकडे नाहीत. त्यामुळे आयआयटी रुरकीच्या अहवालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. आयआयटीचा अहवाल आल्यानंतरच राज्य सरकार अलमट्टी बाबत अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे.
पूरस्थिती का निर्माण होते…
राज्य सरकारने आजवर स्थापन केलेल्या कोणत्याही समितीने अलमट्टी आणि कोल्हापूर, सांगलीतील पुराचा संबंध आहे, असे म्हटलेले नाही. त्यामुळे आयआयटी रुरकीचा अहवालही तसाच येणार आहे. नदीपात्रात झालेली अतिक्रमणे आणि अतिवृष्टी काळात धरणांतून एकाच वेळी होणाऱ्या विसर्गामुळे पूरस्थिती निर्माण होते, असे मत जलसंपदाचे निवृत्त अभियंता रवींद्र पाठक यांनी व्यक्त केले.