मुंबई : विधिमंडळ सभागृहात मोबाईलवर रमीचा गेम खेळताना चित्रफितीत कैद झालेले वादग्रस्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना पाठीशी घालण्याच्या निर्णयावरून काँग्रेसने राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात. विधिमंडळात कामकाज सुरू असताना मंत्री रमीचा डाव खेळतात आणि सरकार अशा बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही. कोकाटे यांचा राजीनामा न घेणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
राज्याचे गृह राज्यमंत्री डान्सबार चालवतात. एका मंत्र्यांकडे पैशाच्या बॅगा सापडतात. पण तरीही यांची पाठराखण जर करण्यात येत असेल तर या सर्व मंत्र्यांवर गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे. लाडकी बहिण म्हणायचे आणि बारमध्ये बहिणींना नाचवायचे असा किळसवाणा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात कधी झाला नव्हता, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. नागपूरमधील बारमध्ये अधिकारी फायली घेऊन बसतात. हे अधिकारी गडचिरोलीचे असल्याची माहिती समोर येत आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत, याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.
एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांची बँकाकडे ३५ हजार कोटींची थकबाकी आहे. शेतकरी आता कर्ज घेऊ शकणार नाहीत. शेतकरी अडचणीत आला असून सरकारला त्याचे देणेघेणे नाही. शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी विरोध करीत आहेत. या महामार्गासाठी सरकार पैसे द्यायला तयार आहे, पण शेतकरी कर्जमाफी मागत असताना त्यासाठी सरकार तयार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. महायुती सरकारमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. बाहेरून दाखवायला सगळे सुरळीत आहे, पण आतून प्रचंड असंतोष आहे. या सरकारमधील दोन पक्षांना सत्तेत टिकून रहायचे असल्याने ते तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.