अकोला : वान धरणात ८० फूट खोल पाण्यात बुडून ३० वर्षीय तरुणाचा अंत झाला. संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांची शोध मोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला. अकोला जिल्ह्यात २४ तासांत बुडाल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.तेल्हारा तालुक्यातील हनुमान सागर वारी येथील धरणात तेल्हारा तालुक्यातील दानापुर येथील जितेंद्र मनमोहन राठी (वय ३० वर्ष) यांची धरणावरील भिंतीवर दुचाकी आणि पाण्यात चप्पल तरंगत आढळून आली. जितेंद्र राठी धरणात बुडाल्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर दोन चमूद्वारे शोध मोहीम सुरू करण्यात आली.

बुडल्याच्या निश्चित ठिकाणाची कल्पना नसल्याने शोध कार्यात अडचणी येत होत्या. सखोलपणे शोध मोहीम राबविण्यासाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनद्वारे संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देण्यात आली. बोरमळी धरणात बुडालेल्या दोन मुलांचा शोध पथक घेत होते. त्या ठिकाणची मोहीम पूर्ण झाल्यानंतर पथक प्रमुख दीपक सदाफळे, मयुर सळेदार, शेखर केवट, अंकुश सदाफळे, विष्णु केवट, किशोर तायडे, शिवम वानखडे, सार्थक वानखडे हे शोध व बचाव साहित्यासह वारी हनुमान सागर धरणाकडे रवाना झाले. ७ जूनला रात्री ८ वाजताच्या सुमारास घटनास्थळावर दाखल होताच त्यांनी शोध मोहीम सुरू केली. बुडाल्याचे निश्चित स्थळ स्पष्ट नसल्यासोबतच धरणात ७० ते ८० फूट खोल पाणी आणि कपारी असल्याने मोहिमेत अडथळे निर्माण झाले होते. तरी देखील शोध मोहीम सुरूच ठेवण्यात आली. अथक प्रयत्नानंतर रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ८० फूट खोल पाण्यात तळाशी असलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. बुडून मृत्यू की आत्महत्या या दृष्टीने हिवरखेड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२४ तासांत तीन जण बुडाले

अकोला जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये बुडाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या तिन्ही जणांचे मृतदेह संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांची शोध मोहीम राबवून बाहेर काढले. चिखलगाव येथील दोन मुलांचा बोरमळी चेलगाव येथील धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ७ जानेवारी रोजी दुपारी घडली होती. त्यानंतर रात्री वान धरणात बुडून तरुणाचा मृत्यू झाला.