जळगाव जिल्ह्यातील एका युवकाचे मेहकर येथील युवतीसोबत दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले. मात्र, नवरी दोनच दिवसात पसार झाल्याने वरपक्षाने लग्नात मध्यस्थी करणाऱ्याकडे दिलेल्या रकमेसाठी तगादा लावला. मात्र, दलालांकडून पैसे मिळत नसल्याने त्या वृद्ध मध्यस्थीने आत्महत्या केली. या प्रकरणी मेहकरातील तिघांना पिंपळगाव (जिल्हा जळगाव) पोलिसांनी गजाआड केले आहे.

हेही वाचा- पत्नीला प्रसुतीसाठी रुग्णालयात आणणाऱ्या मूकबधिर युवकाची तेथील मूकबधिर परिचारिकेशी ओळख झाली, अन्…

दयाराम चौधरी (६८, रा. शिंदाड, पाचोरा, जिल्हा जळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. त्यांनी गावातील उत्तम चौधरी यांच्या शेतातील झाडाला ठिबक सिंचनच्या नळीने गळफास लावून मागील २ ऑगस्ट २०२२ रोजी आत्महत्या केली. प्रकरणी त्यांचा मुलगा काशीनाथ चौधरी याने पिंपळगाव पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर २०२२ ला तक्रार केली. पोलिसांनी डोणगाव येथील राहिवासी शफउत खान जब्बार खान, रसूल रफिक बागवान, भुऱ्या (पूर्ण नाव नमूद नाही) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करून गजाआड केले. तपासाअंती विलक्षण कहानी समोर आली.

हेही वाचा- गरबा खेळताना मृत्यूने गाठले; व्यावसायिकाचा हृदयघाताने मृत्यू

जळगाव खान्देश येथील नागदेवळा (ता पाचोरा) येथील एका मुलाचे लग्न जुळत नव्हते. त्याने त्यांच्याच समाजातील दयाराम नारायण चौधरी यांना एखादी मुलगी पहा असे सांगितले. त्यांनी वरील तिघांशी संपर्क साधला असता त्यांनी मेहकर येथील स्वप्नप्रिया (काल्पनिक नाव) या मुलीचे स्थळ सुचविले. मुलगी पसंत पडल्याने लग्नाची बोलणी सुरु झाली. आरोपींनी दयाराम चौधरी यांच्याकडून लग्न जुळवून देण्यासाठी १ लाख ३० हजार रुपये घेतले. २६ जुलै २०२२ रोजी पाचोरा येथे लग्न पार पडले. मात्र, २८ जुलैला नवरी पसार झाली.

हेही वाचा- भंडारा : पालकमंत्री येणार म्हणून रात्रभर जागून केली रस्त्यांची डागडुजी; नगर पालिकेचा प्रताप

त्यामुळे वराकडील परिवाराने मुलीच्या आईला, नातेवाईकांकडे वधू आणून सोडा किंवा लग्न जुळवण्यासाठी दिलेले पैसे परत द्या, असा तगादा लावला. तसेच मध्यस्थी करणारे दयाराम चौधरी यांच्याकडे वारंवार विचारणा सुरु केली. दयाराम यांनी त्या तिघांकडे सतत पैशाची मागणी केली. मात्र, ना पैसे परत मिळाले ना नवरी परत आली. यामुळे त्रस्त दयाराम चौधरी यांनी आत्महत्या केली. तपास चक्र फिरल्यावर लग्नाची ही बाब उघड झाली.