नागपूर : काँग्रेस जय हिंद यात्रा काढत असेल तर ठीक आहे. परंतु, आमची अपेक्षा एवढीच असेल ती राजकीय यात्रा होऊ नये. भारतीय सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका. ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलायला लागले त्यातून त्यांचा सेनेप्रति अविश्वास दिसतो आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रविवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशीष देशमुख यांनी सहभाग घेतला. यात्रेनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले, काही लोक नकारात्मक असतात. त्यांना समाज आणि देशासोबत काहीही देणेघेणे नसते. ते केवळ राजकारण करतात. त्यामुळे ते संपत चालले आहे. काँग्रेस जय हिंद यात्रा काढत आहे आणि दुसरीकडे भारतीय सेनेवर अविश्वास दाखवत आहे. संपूर्ण देश आज भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभा आहे, असेही फडणवीस म्हणाले.
‘आत्मनिर्भर भारताची ताकद दिसली’
प्रत्येकाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी व आपल्या वीर जवानांप्रति कृतज्ञता प्रतीत व्हावी यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला यशस्वी होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून जिंकलेल्या या युद्धाने भारताची ताकद व पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारता’ची झलक संपूर्ण जगाला दिसली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे ते म्हणाले.