रेल्वे स्थानक म्हटले की डोळ्यांसमोर येतात ‘कुली’. याच कुलींच्या सेवा दरात आता वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना सामानाच्या हमालीसाठी आता नेहमीपेक्षा ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. यासंदर्भातील निर्णय रेल्वेकडून नुकताच घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने पूर्वीच्या भाडे दरापेक्षा दहा ते पंधरा रुपयांनी वाढ केली आहे. मात्र, याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसणार आहे.

जादा पैसे मागितल्यास तक्रार करा

हमालांच्या सेवेचे वाढलेले दर रेल्वे प्रशासनाने समोरील बाजूस प्रसिध्द केले आहेत. त्यातील दरापेक्षा अधिक पैसे हमालांनी मागितले तर रेल्वेच्या स्टेशनमास्तरांकडे याबाबत तक्रार करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भुसावळ रेल्वे विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर कुली बांधवांच्या हमालीचे सुधारित दर लागू केले आहेत. हे नवीन दर १ जूनपासून लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार ४० किलो वजनाच्या प्रत्येक फेरीसाठी १०० रूपये आणि प्रतीक्षा शुल्कही निश्चित केले आहे.

नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, खंडवा, बडनेरा, मूर्तिजापूर, पाचोरा, नांदुरा, निफाड, नवी अमरावती आदी स्थानकांवर हमाल सेवेचा दर प्रती फेरी १०० रुपये असेल. म्हणजेच या स्थानकांवर हमालांकडून एका फेरीसाठी ४० किलो वजनापर्यंत १०० रूपये इतके शुल्क आकारले जाईल. तसेच पहिल्या ३० मिनिटांनंतर प्रतीक्षा शुल्क लागू होईल. प्रत्येक अर्ध्या तासासाठी किंवा त्याच्या अंशासाठी अतिरिक्त १०० आकारले जातील. इतर लहान स्थानकांवर ८० रुपये दर असेल.

दिव्यांगांसाठी विशेष दर

दिव्यांग, आजारी प्रवाशांना स्ट्रेचर किंवा चाकांच्या खुर्चीद्वारे बर नेण्यासाठी दोन हमालांमार्फत सेवा घेतल्यास १५० आणि ४ हमालांद्वारे सेवा घेतल्यास २०० शुल्क आकारले जाईल.

‘चाकांच्या बॅगां’मुळे उतरती कळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हमाल आणि प्रवासी हे एकमेकांवर अवलंबून असतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांचे हमालांवरील अवलंबित्व कमी झाले असून, या व्यवसायास उतरती कळा लागल्याचे हमाल सांगतात. विविध कारणांमुळे हमालांचा व्यवसाय किमान ५० टक्क्यांनी घटल्याचा दावा हमालांकडून केला जातो. त्यास प्रमुख कारण ठरले ते म्हणजे आधुनिक पद्धतीच्या चाकांच्या बॅगा. सॅकबॅगपासून मोठ्या बॅगांना असलेल्या लवचिक आणि भक्कम चाकांमुळे सामान ने- आण करण्यासाठी हमालांची आवश्यकता भासत नाही. स्वतःचे सामान स्वतःच वाहून नेण्याची सुविधा असल्याने पूर्वीइतका त्रास जाणवत नाही. त्यामुळे हमालांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे सांगितले जाते.