नागपूर : एखाद्या कामाचे श्रेय कसे घ्यायचे हे राजकारण्यांना चांगलेच कळते. कामाचे श्रेय घेण्यासाठी आपसात भांडण, वादविवादही बघायला मिळतात. अशीच प्रचिती नागपूरमध्ये शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात आली. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी श्रेय दिले जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. या नाराजीवर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ ला येथे उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचा लाेकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट, राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित हाेते.
नेमके काय झाले?
शिरसाट यांनी त्यांच्या भाषणात श्रेयवाद कसा घ्यायचा हे आपण आजच्या कार्यक्रमात शिकल्याचा टोला लगावला. इथल्या कामासाठी माझ्या विभागानेही निधी दिला, मात्र सर्वजण बावनकुळेंचे कौतुक करत आहेत. इथे सर्व विदर्भातील नेते असून ते एकोप्याने वागले. आपल्या विभागाने निधी दिलेल्या कामाचे श्रेय मात्र बावनकुळे आणि विदर्भातील नेत्यांना मिळत आहे. त्यामुळे श्रेयवाद कसा जोपासायचा हे आपण शिकलो असाही टोला शिरसाट यांनी लगावला. शिरसाट यांच्यानंतर गडकरी यांचे भाषण झाले. भाषणादरम्यान गडकरी यांनीही शिरसाट यांना टोला लावला आणि म्हणाले, या कामाचे श्रेय सामाजिक मंत्री शिरसाट यांना आहेच, मात्र यासाठी निधी तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यकाळात मिळालेला आहे. शिरसाटांनी केलेल्या वक्तव्यावर नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. नागपुरातील संविधान उद्देशिका पार्कच्या कामासाठी सर्वच विभागांचा निधी वापरल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. तत्पूर्वी शिरसाट यांनी आणखी एका विषयावरून मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. संजय शिरसाट म्हणाले की, तिथे मुख्यमंत्री फडणवीस पोहचले आणि गप्पा मारताना ‘आपण बसलेली ही रूम पाडणार’ असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यानंतर इथे दुसरे काही निर्माण होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे का? असा सवाल शिरसाट यांनी त्यांच्या भाषणात केला. काही वेळानंतर भाषणासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात संजय शिरसाट यांनी याबाबत अर्धसत्य सांगितल्याचा दावा केला. ती रूम पाडली जाणार, मात्र हे आपण आकसाने नव्हे तर विधि महाविद्यालयात नवी इमारत तयार करायची आहे त्या भावनेतून बोलल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.