गोंदिया: सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेची माणल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बँकेच्या सत्तेची किल्ली आपल्याकडे यावी, या अनुषंगाने राजकीय पक्षाचे पुढारीही कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे पॅनलने अद्यापही अधिकृत उमेदवारांचे पत्ते उघडले नसले तरी निवडणूक लढविणाऱ्यांनी मतदारांशी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. येत्या २९ जून रोजी निवडणूक होणार आहे. निवडणूक रिंगणात ४५ पेक्षा अधिक उमेदवार राहणार, असे चित्र दिसून येत आहे. ८९४ मतदारांच्या हातात सत्तीची किल्ली असून ती कुणाला सोपवणार, याकडे लक्ष लागले आहे.

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार रिंगणात राहणार आहेत. त्याच प्रमाणे निवडणूक शांतता व पादर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणाही कामाला लागेली आहे. एकूण २० संचालक पदासाठी निवडणूक होत आहे. जिल्हास्तरीय १२ व सेवा सहकारी मतदार संघातून तालुका निहाय ८ असे एकूण २० संचालकांची निवड करण्यात येणार आहे. एकूण ८९४ मतदार निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. अद्यापपर्यंत कोणतेही पॅनलने उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली नाही, पक्षांच्या पुढाऱ्यांकडून उमेदवारांचे नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. असे असले तरी ज्या उमेदवारांना हिरवी झेंडी देण्यात आली आहे, त्या उमेदवारांनी मतदारांचे भेटीगाठी सुरू केल्या आहेत. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीकरिता भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युती झालेली आहे तर काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढणार असल्याचे चित्र आहे.

जिल्हास्तरीय पाचही गटात चुरस !

जिल्हास्तरीय ५ संचालक पदाच्या निवडणूक रिंगणात चांगलीच चुरस पहावयास मिळणार आहे. ओबीसी प्रवर्गातून तब्बल १६ उमेदवार, अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून १० तर महिला प्रतिनिधीमधून २ जागेसाठी १३ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. सोमवार २ मे रोजी नामांकन अर्जाची छाणनी करण्यात आली.यात सर्व उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहे. त्यामुळे पाचही गटात चांगलीच चुरस पहावयास मिळणार, असे चित्र दिसून येत आहे.

टोकन घ्या… सहलीला चला…

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाच्या मतदार संघातून तालुकानिहाय एक संचालक बँकेवर पाठवण्यात येणार आहे. त्याच बरोबर इतर सात मतदार संघ आणि जिल्हास्तराच्या मतदार संघातून १२ संचालक निवडूण पाठवणार आहेत. त्या अनुषंगाने निवडणूक लढविणाऱ्यांनी मतदारांकडे साकडे घालणे सुरू केले आहे. उमेदवारांचे समर्थक मतदारांना भेटून टोकन घ्या… सहलीला चला… असे सांगत आहेत. मात्र तब्बल २८ दिवस सहलीला येवू शकत नाही, असे बोलून मतदार देखील निवडणूक लढविणाऱ्यांची परीक्षा घेत आहेत.