जळगाव : देवेंद्र फडणवीस याआधी मुख्यमंत्री असतानाचा काळ अत्यंत चांगला होता. मात्र, याआधी महायुती सत्तेत असताना नंतरचा अडीच वर्षांचा काळ आमच्यासाठी खूपच त्रासदायक ठरला, अशा शब्दांत भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मंत्री महाजन यांनी महायुतीचाच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवरच (एकनाथ शिंदे) अप्रत्यक्षपणे टीका केली. याशिवाय, आपले कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी नामोल्लेख टाळून जोरदार हल्ला चढविला. कोणी काहीही बोलत असेल, तर त्याकडे लक्ष देऊ नका.

बडबड करणाऱ्यांची अवस्था काय आहे, हे जनतेला माहीत आहे. त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून ते प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे बोलतात. कोणी तरी काही तरी बोलत राहते. कारण त्यांना कोणी विचारत नाही. आपल्याविषयी बोलूनच त्यांना प्रसिद्धी मिळते. आपण मात्र आपल्या मार्गावर ठाम राहायला हवे, असा सल्लाही मंत्री महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिला. सध्या जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पंचायत समित्यांवर भाजपची सत्ता आहे, तसेच ग्रामपंचायतींमध्येही भाजपचे सरपंच मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हीच घोडदौड आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्येही कायम राहिली पाहिजे. भाजप संघटनात्मकदृष्ट्या बळकट झाला आहे. ही ताकद आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दाखवायला हवी. कार्यकर्त्यांनी जोमाने मैदानात उतरून भाजपची सत्ता सर्वत्र प्रस्थापित केली पाहिजे, असे  मंत्री महाजन यांनी सांगितले.