नंदुरबार : आदिवासी बांधवांच्या विकासाच्या कार्ययोजना आखण्यासाठी वस्तुनिष्ठ आणि अद्ययावत सांख्यिकी माहिती उपलब्ध व्हावी म्हणून १७ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये मार्चपासून मूल्यांकन (बेंचमार्क) सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. सध्या प्रायोगिक तत्वावर नंदुरबार जिल्ह्यात अशा पद्धतीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून आठ महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. डाॅ. गावित यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा : नाशिक : फवारणी औषधामुळे शेतकऱ्याचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील २६ वर्षात आदिवासींसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यांची किती फलश्रृती झाली, सध्या आदिवासींची रोजगार, शिक्षण, आर्थिक, सामाजिक स्थिती नेमकी काय आहे, त्यात कोणत्या सुधारणांची गरज आहे, या अनुशंगाने आता सर्वेक्षण करणे आवश्यक झाले आहे. यासाठी केंद्राने आदिवासी विभागाला अडीच कोटींचा निधी देखील दिला होता. प्रायोगिक तत्वावर नंदुरबार जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून आठ महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल. या सर्वेक्षणातून स्थलांतराची स्थिती, त्याची कारणे, शिक्षण गळती प्रमाण, त्यात सुधार पद्धतीची आवश्यकता या सर्व बाबी अंतर्भूत केल्या जाणार आहेत. या सर्वेक्षणांवरुन आगामी काळात आदिवासी बांधवांच्या विकासासाठी योजनांची अंमलबजावणी आखणी आणि त्याचे नियोजन सुकर होईल, असा आशावाद मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.