नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्सवमूर्ती विसर्जनासाठी मुंबईकरांचा मोठा ओघ मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू राहतो. यावेळी भाविकांना घरी परतण्यासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. ६ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२५ (शनिवार/रविवार मध्यरात्र) दरम्यान हार्बर मध्यरात्री धावणाऱ्या विशेष लोकल गाड्यांची घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल या दरम्यानच्या भाविकांसाठी दोन विशेष गाड्या धावणार आहेत.

ज्यामध्ये पहिली गाडी पहाटे १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटून २.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल.

तर दुसरी गाडी पहाटे २.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटून ४.०५ वाजता पनवेल येथे दाखल होईल.

याउलट पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडेही दोन विशेष गाड्या धावणार आहेत.

ज्यात १.०० वाजता पनवेलहून सुटणारी पहिली गाडी २.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.

तर १.४५ वाजता पनवेलहून सुटणारी दुसरी गाडी ३.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दाखल होईल.

दरम्यान, ट्रान्स हार्बर मार्गाबद्दल (ठाणे-वाशी) मध्य रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

तरी रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच कळवल्याप्रमाणे, गणेशोत्सवाच्या काळात ४/५, ५/६ आणि ६/७ सप्टेंबर रोजी मुख्य मार्गावर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ठाणे)ही मध्यरात्री विशेष गाड्या धावणार आहेत. आता त्यात हार्बर मार्गाचीही भर घालण्यात आली आहे.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, गर्दी टाळण्यासाठी या विशेष गाड्यांचा वापर करावा. विसर्जनाच्या दिवशी रस्त्यांवर मोठी वाहतूककोंडी होत असल्याने रेल्वेचा प्रवास अधिक सोयीस्कर ठरणार आहे.गणेशोत्सवात मुंबईत होणाऱ्या भाविकांच्या गर्दीला हाताळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने केलेली ही विशेष व्यवस्था म्हणजे भाविकांसाठी मोठा दिलासा असल्याचे मानले जात आहे.