लोकसत्ता टीम

पनवेल : कोकण पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारासाठी पनवेलमधील आद्यक्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या सभेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पदवीधरांना साद घालत राज्याची वाताहात करणाऱ्या व्यवस्थेला संपवण्याचा अधिकार पदवीधरांना असून जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी महाविकास आघाडीतील शेकापेच सरचिटणीस जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, शिवसेना (ठाकरे गटाचे) कोकण समन्वयक विजय कदम, पनवेल शहर जिल्हा निरीक्षक माजी आमदार हुस्न बानू खलिफे, काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार नसीम खान, उमेदवार रमेश किर, शिवसेनेचे बबन पाटील, सेनेचे जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेकापचे काशिनाथ पाटील, शेकापचे गणेश कडू, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार गट) सतीश पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती नारायण शेठ घरत, सेनेचे शिरीष बुटाला, पनवेल शहर काँग्रेस कमिटी महिला आघाडी अध्यक्ष निर्मला म्हात्रे, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे व इतर नेते उपस्थित होते.  

आणखी वाचा-रबाळे परिसरात अडीच तासांत तीन घरफोड्या

महाविकास आघाडीचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार कीर यांनी त्यांच्या निवेदनात मागील १२ वर्षात कोकण पदवीधर मतदारसंघांमध्ये आमदाराचे अस्तित्व जाणवत नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच विद्यमान आमदारांनी प्रसिद्ध केलेल्या २० पानी पत्रकामध्ये पदवीधरांची फसवणूक केली. कीर यांनी त्यांना मतदारांनी संधी दिल्यास ते रोजगार निर्मितीसाठी, जुनी पेन्शन योजना लागू करणे,  यासाठी आमचा अग्रक्रम असेल तसेच जिल्हा उद्योग केंद्रांना भेटी देऊन उपलब्ध रोजगारांची माहिती घेऊन ती बेरोजगारांपर्यंत पोहोचवण्याचे काम करू असे आश्वासन यावेळी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाना पटोले यांच्या निवेदनात त्यांनी राज्याची सध्याची ओळख बेरोजगारांचे राज्य अशी झाली असून मागील दहा वर्षात केंद्र सरकाराने महाराष्ट्राची वाताहत लावल्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच राज्यात १७ हजार पोलिस पदांची भरती होत असून त्यासाठी १७ लाख अर्ज आले असून यामुळे बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे पटोले म्हणाले. भरती प्रक्रियेमधील अनागोंदीमुळे सध्याचा सूशिक्षित तरुण हवालदिल झाल्याचे पटोले म्हणाले.