पालघर : पालघर शहरात मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाली असली तरी उघड्या गटारी, गटारीच्या झाकणाची दुरावस्था व तुटलेल्या झाकणांची स्थिती अजूनही कायम असून याकडे पालघर नगर परिषदेचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. मुख्य म्हणजे झाकणे तुटलेली गटारे ही वाहतुकीच्या मार्गावर असून आता शाळांना सुट्टी झाल्याने या मार्गांवरून विद्यार्थ्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे एखादा विद्यार्थी गटारामध्ये पडून अपघात होण्याची शक्यता दिसून येत आहे.
पालघर पश्चिमेकडील देवीसहाय मार्ग, लोकमान्य नगर, रेल्वे स्टेशन परिसर, माहीम रोड, कचेरी रोड, बिडको यासह अन्य मुख्य रस्त्यांवर सकाळ संध्याकाळ ते रात्री उशिरापर्यंत सतत वाहतूक सुरू असते. शाळांना सुरुवात झाल्यामुळे पायी किंवा सायकलने जाणारे विद्यार्थी याच मार्गांचा वापर करतात. मात्र या मुख्य रस्त्यांवर असलेल्या भूमिगत गटारांवर सिमेंटचे अथवा पत्र्याचे झाकण तुटून दुरावस्था झाली आहे. तसेच अनेक गटारांवर झाकणच नसल्याने गटारी उघडी पडली आहेत.
देवीसहाय मार्गावर रस्त्याच्या मधोमध असलेल्या गटारीचे झाकण मागील आठवड्यात निघाले असून लोखंडाचे असलेले हे झाकण धोकादायक स्थितीत ठेवण्यात आले आहे. दिवसभर सुरू राहणाऱ्या या वाहतुकीच्या रस्त्यावर त्या उघड्या व धोकादायक गटारीमुळे रात्रीच्या वेळी मोठा अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. असे असताना आठवडा उलटून देखील तीच स्थिती कायम असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून तर काही ठिकाणांची गटारे अनेक वर्षांपासून उघडी व तुटलेल्या अवस्थेत असल्याने या गटारामध्ये कोणी पडून अपघात व मृत्यू होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्यास या ठिकाणी दुचाकी अथवा अन्य वाहन पडून मोठा अपघात होण्याची शक्यता दुकानदार व वाहतूकदारांकडून व्यक्त येत आहे. आता पावसाळा सुरू होत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याने या गटारीचा अंदाज येत नाही अशावेळी घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिक करीत आहे. याबाबत नगर परिषदेच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता शहरातील ज्या भागात चेंबर तुटलेले आहेत तिथे झाकणे बदलून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी जाब कोणाकडे विचारायचा
पालघर शहरात रस्ता रुंदीकरण, काँक्रिटीकरण, दुभाजकांची विकास कामे होत असताना अशा प्रकारे गटार उघडे पडत असेल व या गटारीमुळे एखाद्याचा जीव गेला तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जाब विचारायचा. अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेल्या गटारीच्या रस्त्याने अनेक प्रशासकीय कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते प्रवास करत असतील. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
झाकणे बदलायला इतका उशीर का?
देवीसहाय मार्गावर पत्र्याचे झाकण रस्त्याच्या मधोमध तुटून उघड्या पडलेल्या गटारीला आठवडा उलटला आहे. बांधकाम विभागाने हा रस्ता देखभाल दुरुस्तीमध्ये येत असून संबंधित ठेकेदाराला याबाबत कळविण्यात येईल असे सांगितले होते. मात्र आठवडा उलटून देखील वाहतुकीच्या रस्त्यावर तीच अवस्था कायम असल्याने गटाराचे एकच लोखंडी झाकण बदलायला इतका उशीर का असा प्रश्न नागरिक करीत आहे.