छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांची प्रतिमा ‘मुस्लिम स्नेही’ ठरिवण्याच्या महायुतीच्या प्रयत्नाची ‘एमआयएम’ कडून टर उडवली जात आहे. या निमित्ताने महायुतीचे नेते चंद्रकांत खैरे आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभे करू लागले आहेत. त्यामुळे प्रचाराचा रंग आता बदलू लागला आहे.

एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ॲड्. असदोद्दीन ओवेसी यांनी चंद्रकांत खैरे यांच्या मुस्लिम भागात मत मागण्याच्या प्रचारावर टोकदार टीका केली. ओवेसी म्हणाले, ‘ते कधी ईदगाहवर आले होते का ?, पण तुमच्या एकजुटीमुळे ते ईदगाहवर शुभेच्छा देण्यासाठी आले. आता त्यांचा एक व्हिडीओ पुढे आला आहे. त्यात ते नमाज अदा केल्याने ‘दिल साफ’ राहतो, असे म्हणत आहेत. ‘नमाजानंतर दोन हात उघडून फूंक मारल्याने आजार बरे होतात,’ असेही ते म्हणत आहेत. जर गेल्या निवडणुकीत मुस्लिमांनी एकजूट दाखवली नसती आणि राजकीय शहाणपण दाखवले नसते तर गेली २८ वर्षे स्वत: हिंदुत्ववादी म्हणणारे खैरे असे वागले असते का, ’ असा प्रश्न विचारत खैरे यांच्या मुस्लिमस्नेहावर ते प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ‘एमआयएम’ ची मते फुटून थोड्याफार प्रमाणात जरी ती चंद्रकांत खैरे यांच्या पारड्यात पडली तरी पराभव पत्करावा लागेल, हे माहीत असल्याने ओवेसी यांनी खैरे यांच्या मुस्लिमस्नेहावर प्रश्नचिन्ह उभे करायला सुरुवात केली आहे. टीकेची धार अधिक तीक्ष्ण करत ओवेसी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनाही प्रश्न विचारतात, जर मुस्लिमांची मते हवी असतील तर बाबरीचे पतन हा शिवसेनेच्या आयुष्यातील गुन्हा होता, हे कबुल करा.’

हेही वाचा : बसपा अध्यक्ष मायावती यांचा पुतण्या आकाश आनंद नेमका कोण?

एका बाजूला ‘एमआयएम’ कडून होणारी ही टीका महायुतीच्या व्यासपीठावरुनही होताना दिसू लागली आहे. पण महायुतीच्या प्रचारात चंद्रकांत खैरे व त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर ‘हिंदुत्व ’ सोडल्याचा आरोप होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘याकुब मेमन याची कबर कोणी सजवली होती’, असा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका सोडल्याचा आरोप केला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात धर्मनिरपेक्ष दिसणारे रंग आता धूसर होऊ लागले आहेत. या सगळया घटनांच्या अनुषंगाने चंद्रकांत खैरे यांना पत्रकार बैठकीत विचारले असता ते म्हणाले, ‘२८ वर्षांपूर्वी मी जेव्हा पहिला हिंदू आमदार झालो तेव्हापासून शहरात दंगल होऊ दिली नाही. राजाबाजार व किराडपुऱ्यातील दंगल काही जणांनी घडवून आणली. पण गेली अनेक वर्षे शांतता प्रस्थापित केल्यामुळेच या शहराचा औद्योगिक विकास झाला. आम्ही सारे नीट करण्याचा प्रयत्न करत आलो आहोत.’ दरम्यान हे सगळे घडवून आणणारा एमआयएम हा पक्षच भाजपची ब चमू आहे. त्यामुळे त्या दोघांच्या प्रचारात आम्ही पडणार नाही. बेरोजगारी, महागाई, शेतमालाचे प्रश्न या प्रचाराच्या मुद्दयावर निवडणूक लढवू, असे उत्तर शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी दिले.