कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यातील लढत अटळ मानली जात असताना महाविकास आघाडीनेही उमेदवारी उभा करण्याचा निर्णय बुधवारच्या बैठकीत घेतला आहे. यामुळे या आखाड्यामध्ये तुल्यबळ तिरंगी लढत होणार आहे. तसे झाल्यास नेमका कोणाचा राजकीय फायदा होणार यावरून रंजक ठरणारी आकडेमोड, राजकीय समीकरणे मांडण्यास सुरुवात झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा होऊ लागली आहे. अद्याप कोल्हापूर जिल्ह्यातील महायुती व मविआ कडून उमेदवार जाहीर झालेला नाही. इकडे राजू शेट्टी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मविआने त्यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, शेट्टी हे मविआचे उमेदवार होण्यास तयार नाहीत. मविआने बाहेरून पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा ते बोलून दाखवत आहेत. यामुळे मविआ – शेट्टी यांच्यातील अंतर वाढीस लागले असून गुंतागुंत वाढीस लागली आहे.

हेही वाचा : राज्यातील भाजपच्या २० पैकी सात उमेदवारांची पार्श्वभूमी घराणेशाहीची !

मातोश्रीकडे लक्ष

शेट्टी यांच्या या भूमिकेमुळे मविआने आपलाच उमेदवार रिंगणात उतरवून ताकदीने लढत देण्याची तयारी चालवली आहे. बुधवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्यासह मविआच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कोल्हापुरात बैठक झाली. त्यामध्ये हातकणंगले मधून राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्याची तयारी असताना ते ती नाकारत आहेत. त्यांची भूमिका अशी ताठर असेल तर ठाकरे सेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यापैकी एकाला उमेदवारी देवून किल्ला सर करूया, असा निर्णय घेण्यात आला. मविआअंतर्गत जागावाटपात हातकणंगले मतदारसंघ ठाकरे सेनेकडे जाणार आहे. त्यामुळे ठाकरे कोणती भूमिका घेणार याला महत्त्व आले आहे.

हेही वाचा : Loksabha Election 2024 : मतांच्या जोगव्यासाठी राजकीय पक्षांचे स्त्रीदाक्षिण्य

इकडे, महाविकास आघाडीकडून मतदारसंघाची भौगोलिक राजकीय ताकदीची कुंडली मांडून त्याआधारे विजयाची समीकरणे मांडली जात आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार राजू आवळे, दोन माजी आमदार सुजित मिणचेकर – राजीव आवळे, शिरोळमध्ये माजी आमदार उल्हास पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, इचलकरंजी मविआची एकत्रित ताकद, शाहूवाडी पन्हाळ्यात आमदारकी घराण्यात राहिलेली तिन्ही घराणी सत्यजित पाटील सरूडकर, गोकुळचे संचालक करण गायकवाड व अमर पाटील, सांगलीतील दोन्ही तालुक्यात असणारा मोठा राजकीय प्रभाव, वाळव्यात जयंत पाटील तर शिराळ्यात आमदार मानसिंग गायकवाड, माजी मंत्री शिवाजीराव नाईक अशी राष्ट्रवादीची मोठी ताकद मिळणार असल्याने या मतदारसंघात मविआचे यशाचे गणितविजयाचे गणित जुळेल असा आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : नांदेडची जागा निवडून आणण्याचे अशोक चव्हाणांपुढे आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेट्टींना पाठिंबा हवा

मविआच्या या बैठकीनंतर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया राजकीय परिणाम कोणते होऊ शकतील याबाबत सूचक ठरली. हातकणंगले मतदारसंघ ठाकरे सेनेकडे आहे. ते येथे उमेदवार देणार असतील तर हा भाजपला मदत करण्याचा प्रकार आहे. आघाडी सोबत मी जाणार नाही, पण आघाडीने पाठिंबा दिला तर राज्यात त्यांना कोठे पाठिंबा द्यायचा याचा स्वाभिमानी विचार करेल, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी नोंदवली आहे. उसाच्या एफआरपीचे तुकडे करण्याचा मविआच्या सत्ता काळातील निर्णय, राष्ट्रीय महामार्ग भूमीअधिग्रण करण्यास कमी दर या चुकीच्या निर्णयामुळे आपण मविआमधून बाहेर पडलो आहे. ही भूमिका ठाकरे यांना समजावून सांगितली आहे. आता निर्णय त्यांनी घ्यावा, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे. यावर आता शेट्टींना बाहेरून पाठिंबा द्यायचा की कोणाच्या हातात मशाल देऊन रिंगणात उतरवायचे याचा फैसला ठाकरे यांच्याकडून अपेक्षित आहे. त्यावरच हातकणंगले मतदारसंघातील यशापयशाची गणिते साकारली जाणार आहेत.