पहलगाम हल्ल्यानंतर राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताचा संदेश पोहोचवण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळांपैकी दोन शिष्टमंडळे मंगळवारी भारतात परतली आहेत. भाजपा नेते बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने परतल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. भाजपा खासदार निशिकांत दुबे, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, फांगनॉन कोन्याक, रेखा शर्मा, सतनाम सिंग संधू व माजी डिप्लोमॅट हर्ष शृंगला यांचा समावेश असलेल्या पांडा यांच्या शिष्टमंडळाने सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन व अल्जेरियासह चार प्रमुख मुस्लीम देशांना भेट दिली. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, शिष्टमंडळाने परतल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना भेटून त्यांचे प्रत्यक्ष अनुभव सांगितले. जयशंकर यांनीही त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
“आम्ही आमच्या वैयक्तिक अनुभवांबद्दल परराष्ट्रमंत्र्यांना माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर देशांना भेट देत भारताची आर्थिक शक्ती वाढवली आणि आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात भारताला जागतिक स्थान मिळवून दिले. दहशतवादाविरुद्ध तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारात सर्व देश भारतासह उभे असल्याचे यावेळी दिसून आले”, असे एका सदस्याने सांगितले.
“जेव्हा आम्ही परदेशात जाऊन माहिती देत होतो, तेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय संस्थांबद्दल बोललो. संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी आणि दहशतवादी नेटवर्कशी असलेल्या जुन्या संबंधांकडे लक्ष वेधले. त्यानंतर पाकिस्तानी भूमीवर भारतीय संरक्षण दलांनी दहशतवादी पायाभूत सुविधांना नेमकं कसं लक्ष्य केलं याबद्दल माहिती देण्यात आली. आम्ही ज्या ज्या देशांना भेट दिली, त्यांनी पहलगाम दहशतवादी घटनेचा निषेध करणारी निवेदनं आधीच जारी केली होती. हे त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावरही सांगितलं”, असेही पुढे सदस्यांनी सांगितले.
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारताचा संदेश पोहोचवण्यासाठी मोदी सरकारने नेते, खासदार व माजी डिप्लोमॅट्सचा समावेश असलेली सात सर्वपक्षीय शिष्टमंडळं स्थापन केली आणि त्यांच्यावर अनेक देशांमध्ये जाऊन भेट देण्याचे व भारताचा दहशतवादाविरुद्धचा संदेश पोहोचवण्याचे काम सोपवले. त्यापैकी दोन शिष्टमंडळं मंगळवारी भारतात परतली.
स्पेन, ग्रीस, स्लोवेनिया, लाटविया व रशियाचा दौरा करणारे द्रमुक खासदार कनिमोई यांच्या नेतृत्वाखालील पथक मंगळवारी दुपारी भारतात पोहोचले. तर, इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान व सिंगापूरचा दौरा करणारे जेडीयूचे नेते संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मंगळवारी रात्री परतले. पुढील काही दिवसांत इतर पथके परत येण्याची अपेक्षा आहे.
सूत्रांनी सांगितले की, सर्व शिष्टमंडळे परतल्यानंतर जयशंकर यांना भेटून त्यांचे अभिप्राय देतील. प्रत्येक शिष्टमंडळाचा नेता त्यांच्या सर्व सदस्यांच्या सूचनांसह परराष्ट्रमंत्र्यांना सादर करण्यासाठी एक अहवाल तयार करील.
बैजयंत पांडा म्हणाले, “हा एक खूप यशस्वी दौरा होता. कारण- शिष्टमंडळाने भेट दिलेल्या सर्व देशांनी दहशतवादाविरुद्ध स्पष्ट भूमिका घेतली आहे. ही एक अतिशय यशस्वी भेट होती. आम्ही ज्या चार देशांना भेट दिली, त्यांनी दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पावले उचलली आहेत आणि त्यांची भूमिकादेखील स्पष्ट आहे. ते भारताला समजून घेतात. भारताचा इतिहास असा आहे की, आपल्याला मागून समर्थन मिळविण्याची आवश्यकता नाही. आपण एक असे राष्ट्र आहोत, ज्याने हजारो वर्षांपासून जगभरातील अन्याय झालेल्यांना आश्रय दिला आहे. अहिंसेचा देश म्हणून जगात स्थान मिळवले आहे.”
“आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यान निर्माण झालेली युद्धसदृश सत्य परिस्थिती आणि त्यासंबंधीची आकडेवारी देण्यासाठी गेलो होतो. त्यामध्ये भारताने भूमिका स्थापित केली की, दहशतवादाशी संबंधित हिंसाचाराला प्रत्युत्तर दिले जाईल आणि तेदेखील अचूक आणि मोजमापाने”, असे पांडा यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पथकाने पाकिस्तानने आपली चुकीची धोरणे बदलावीत आणि दहशतवादाला उघड पाठिंबा देणे थांबवावे. त्यासाठी इस्लामाबादविरुद्धचे आर्थिक निर्बंध, व्यापार व व्हिसावरील निर्बंध व सिंधू पाणी कराराला दिली गेलेली स्थगिती यांसारख्या उपाययोजनांचा तपशीलवार आढावा घेतला.
“आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षांत या राष्ट्रांच्या नेतृत्वाशी खूप चांगले संबंध विकसित केले आहेत आणि त्यांना त्यांच्या संबंधित आणि सर्वोच्च नागरी सन्मानांनी सन्मानित केले गेले आहे. भारताच्या वाढत्या आर्थिक विकासामुळे ही सर्व राष्ट्रे भारताकडे एक संधी म्हणून पाहतात आणि केवळ दहशतवादाविरुद्धच नव्हे, तर इतर आघाड्यांवरही आमच्यासोबत उभे राहू इच्छितात”, असेही ते म्हणाले.
शिष्टमंडळ परतल्यानंतर कनिमोई यांनी माध्यमांना सांगितले, “परदेशात झालेल्या संवादांमध्ये त्यांनी अधोरेखित केले की, केवळ भारतातच नव्हे, तर जगाच्या इतर भागांतही कोणत्याही दहशतवादी हल्ल्याची मुळाशी पाकिस्तान कशा प्रकारे आहे.” “अशा अनेक प्रकरणांमध्ये जेव्हा दहशतवादी हल्ले झाले आहेत तेव्हा त्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षित आणि प्रायोजित केले गेले असल्याचे आढळून आले आहे. हे आम्हाला लोकांना समजावून सांगायचे होते,” असे त्या म्हणाल्या. सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळांच्या रचनेमुळेच जगाला एक अतिशय मजबूत संदेश दिला गेला होता. “लोकांना आश्चर्य वाटले की, शिष्टमंडळाचे नेतृत्व विरोधी पक्षाच्या खासदाराने केले होते. त्यामुळे त्यांना हेदेखील समजले की, भारत एक आहे आणि भारताला केवळ स्वत:च्या देशातलाच नाही, तर जगभरातला दहशतवाद संपवायचा आहे”, असेही कनिमोई म्हणाल्या