शिवसेना (उबाठा) अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी त्यांच्यात संभाव्य समेट घडवून आणण्याबाबत तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या व्यापक हितासाठी वाद बाजूला ठेवण्यास तयार आहोत, असं या दोन्ही नेत्यांनी सांगितलं आहे. यावरून येत्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अशी एक वेगळी युती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. असं असताना मात्र उद्धव ठाकरे यांना राज यांच्याबाबत एक चिंता सतावत आहे. वाद बाजूला ठेवून हातमिळवणी केली तरी राज यांच्यावर भाजपाबाबत विश्वास ठेवता येणार नाही असं उद्धव ठाकरेंना वाटत आहे.

राज ठाकरेंना सल्ला

एकत्र येण्यासाठी राज ठाकरे यांनी पहिलं पाऊल उचललं आहे. चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्यासोबतच्या पॉडकास्टदरम्यान राज ठाकरे यांनी म्हटले की, “माझ्यातील आणि उद्धव यांच्यातील किरकोळ वाद बाजूला ठेवण्यास मी तयार आहे. माझ्यासाठी महाराष्ट्राचे हित मोठे आहे आणि इतर सर्वकाही दुय्यम आहे. मी आमचे किरकोळ वाद बाजूला ठेवू शकतो. त्यांच्यासोबत काम करायला मी तयार आहे, मात्र तेदेखील माझ्यासोबत काम करायला तयार आहेत का हा एकच प्रश्न आहे.” या वक्तव्यातून राज ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकत शिवसेना-मनसे युतीचे संकेत दिलेत. यावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिले आहे. शिवसेने (उबाठा)च्या कामगार संघटनेच्या सदस्यांना संबोधित करताना उद्धव यांनी सांगितले की, “मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी ते त्यांचे वाद बाजूला ठेवण्यास तयार आहेत; असं म्हणत उद्धव यांनी राज यांना महाराष्ट्राच्या विरोधात असलेल्यांशी सलोखा ठेवू नका असा सल्लाही दिला आहे.

“ते राज ठाकरे आहेत. उद्धवदेखील ठाकरे आहेत. त्यांचे संबंध हे कायमचे आहेत. राज यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व वाद बाजूला ठेवण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. यावर उद्ध ठाकरेंनीही राज यांच्याशी कोणताही वाद किंवा मतभेद नसल्याचे सांगितले. आमच्यात वाद असले तरी ते सोडवण्यासाठी वेळ लागणार नाही,” असे शिवसेना (उबाठा)चे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले. राऊत पुढे म्हणाले की, “राज यांनी महाराष्ट्राच्या हिताच्या विरुद्ध असलेल्यांशी व्यवहार करू नये. आम्ही लोकसभा निवडणुकीदरम्यान स्पष्ट केलं होतं की, महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत करू नये. तसंच उद्धव ठाकरेही म्हणाले होते की, काही जण महाराष्ट्राला कमी लेखतात. ते मराठी माणसांच्या हिताच्या विरोधात कट रचत राहतात. राज ठाकरेंनी त्यांच्याशी संबंध ठेवू नये, त्यांनी ही भूमिका स्वीकारावी; जर ते ही भूमिका स्वीकारत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करण्यास तयार आहोत.”

यावेळी राऊत यांनी भाजपावर कडकडीत टीका केली. “भाजपाला ठाकरेंची ओळख संपवून टाकायची आहे, अशा परिस्थितीत जर दोन्ही ठाकरेंनी हातमिळवणी करण्यासाठी सकारात्मक हेतूने पाऊल उचललं आहे तर महाराष्ट्र त्यांचे स्वागतच करेल. आम्ही विकासाकडे सकारात्मक दृष्टिकानोतून पाहत आहेत. आता उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिल्यानंतर आम्ही प्रतिसादाची वाट पाहत आहोत,” असे राऊत यांनी म्हटले आहे.

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या अशा सकारात्मक विधानांमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. “राजकीयदृष्ट्या एकत्र येण्यासाठी दोघेही संपर्कात आहेत, हे सर्व अचानक झालेलं नाही,” असं शिवसेनेच्या (उबाठा) वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडून सलोख्याचे विधान येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आल्याचे बोलले जात आहे. शिवाय सध्या सुरू असलेल्या त्रिभाषा धोरणावरूनही दोघांनी आपली मतं व्यक्त करत भाजपावर टीका केली आहे. महाराष्ट्रात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याच्या पार्श्वभूमीवरदेखील ठाकरे बंधूंची ही सकारात्मक भूमिका महत्त्वाची ठरते. त्रिभाषा धोरणाला शिवसेना (उबाठा), मनसे आणि काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही कडाडून विरोध केला आहे.

उद्धव-राज यांच्यातील वादग्रस्त संबंध

राज्यातील दोन सर्वात आक्रमक पक्षांचे नेतृत्व करणारे दोन्ही ठाकरे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त संबंध आहेत. २००० सालाच्या सुरुवातीला अविभाजित शिवसेनेतील वैयक्तिक शत्रूत्व, नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षा आणि अंतर्गत सत्ता संघर्षांमुळे राज यांनी २००६ मध्ये शिवसेना सोडली. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा त्यांचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यानंतर ठाकरे बंधूंमधील वाद आणखी धगधगत राहिले. मनसेची स्थापना झाल्यानंतर राज आणि उद्धव यांनी अनेकदा एकमेकांना लक्ष्य केले. त्यांच्यातील वादाचे पडसाद अनेकदा सार्वजनिकरित्याही दिसून आले. एकमेकांची विश्वासार्हता कमी करण्याच्या उद्देशाने दोघेही राजकीय भाषणबाजी करत होते. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मूळ तत्त्वांना कमकुवत केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला, तर उद्धव यांनी राजकीय दृष्टिकोनाचा अभाव असलेला तुटलेला गट म्हणून कायम मनसेवर टीका केली.

मराठी जनता विश्वास ठेवेल की नाही?

निवडणुकांदरम्यान दोघेही समान मतदारसंघांसाठी लढतात. मराठी भाषिकांबाबत ही लढत असल्याने त्यांच्यात थेट संघर्ष होतो आणि ते एकमेकांच्या समर्थकांना अधिकाधिक आकर्षित करण्याचाही प्रयत्न करतात. दरम्यान, गेल्या काही वर्षांत असे अनेक प्रसंग घडले ज्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने शिवसेनेशी असलेली युती तोडली. त्यानंतर याचा गंभीर परिणाम सेनेवर झाला. राज आणि उद्धव यांनी हातमिळवणी करण्याच्या शक्यतेबाबत फोनवरून चर्चा केल्याचे म्हटले जात होते. मात्र, सुरुवातीच्या उबदार सलोख्यानंतर उद्धव यांनी हवा तसा प्रतिसाद दिला नसल्याची तक्रार राज यांनी केली. उद्धव यांचा संकोच, राज यांना समान न मानणे, मोठ्या व्यासपीठावर राजकीय वैधता न देण्याची इच्छा; या कारणांमुळे दोघांमधील वाद आणखी चिघळत गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महत्त्वाचं म्हणजे शिवसेना-मनसे युती झाली तरीही राज यांच्या भाजपाबाबतच्या भूमिकेबद्दल उद्धव यांना काहीशी चिंता आहे. भाजपाशी जुळवून घेण्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यापर्यंत कायमच मनसेची भूमिका बदलत आली आहे. याआधीही शिवसेनेने पक्षफुटीचा अनुभव घेतलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट स्वत:ला पक्षाचे संस्थापक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारशाचा खरा वारस समजत आहे, यामुळेच राज यांच्याबाबत उद्धव यांना कीहीशी चिंता नक्कीच आहे. राज यांच्याशी हातमिळवणी केल्यास उद्धव यांचा मतदारांचा आधार कमी होऊ शकतो, तसंच हा मतदारांचा आधार चुरशीच्या निवडणूक परिस्थितीत महत्त्वाचा ठरू शकतो. दरम्यान, ठाकरे बंधू एकत्र आल्यास येत्या काळातील निवडणुकांमध्ये जनतेची कसोटीही लागणार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणाऱ्या ठाकरे बंधूंना पाठिंबा देणं की सत्ताधारी भाजपाच्या मागे जाणं यातून जनतेला निवड करावी लागेल. या सर्व घडामोडीत राजकीय वर्तुळातील काही जण ठाकरे बंधूंना पाठिंबा देण्याच्या भूमिकेत आहेत. मात्र, काही जण यावर किरकोळ विषय असल्याचे भाष्य करतात. तेव्हा शिवसेना-मनसे युती होईल की नाही हे पाहणं उत्सुकतेचं आहे.