छत्रपती संभाजीनगर : व्हिटस् प्रकरणामध्ये मुलगा सिंद्धातच्या व्यवहारातील अनागोंदी पुढे आल्यानंतर अडचणी आलेले समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी मुलास व्यवहारातून माघार घ्यायला सांगितली. या प्रकरणात सिद्धांत शिरसाटचे पाच भागिदार कोण, असा प्रश्न अनुत्तरीत असल्याचा आरोप होत असतानाच मुलगा आणि पत्नी विजया संचालक असणाऱ्या कॅमिओ कंपनीला भूखंड देताना महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक आरक्षण बदल करुन त्यांना भूखंड वाटपात वैध घोळ घातल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. यामुळे मंत्री शिरसाट यांचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पूर्वी एकनाथ खडसे यांच्यावरही औद्योगिक भूखंडातील गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर खडसे यांची राजकीय परवड सुरू असताना भूखंड प्रकरणात आता संजय शिरसाट यांचेही नाव पुढे आले आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाने ज्यांना ‘ गद्दार ’ म्हणून संबोधले अशा आमदारांपैकी अब्दुल सत्तार , संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यावर आर्थिक अनागोंदीच्या व्यवहारातून टीका झाली. मंत्री असताना सत्तार यांच्या स्वीय सहाय्यकाने बियाणे कंपन्यांवर घातलेले छापे, सिल्लोड महोत्सवातील तिकिट विक्री पासून अनेक भूखंड विक्री प्रकरणामुळे सत्तार अडचणीत येऊ लागले होते. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या विरोधात पूर्ण ताकद लावली. पुढे मंत्री पदाच्या शर्यतीतून सत्तार बाजूला फेकले गेले. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार संदीपान भुमरे यांच्यावर ते मद्यविक्री व्यावसायात कसे गुंतलेले आहेत, याचे आरोप केले जात. लोकसभा निवडणुकीमध्येसंदीपान भुमरेसंदीपान भुमरे शपथपत्र दाखल करताना त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलाकडे मद्यविक्रीचे परवाने असल्याचे मान्य केले.
एका सभेत झिंगलेल्या आपल्याच कार्यकर्त्यांला ‘ तू आमचंच ‘गिऱ्हाईक’ आहे. ’ असे ते जाहीर भाषणात म्हणाले होते. मात्र, मंत्री शिरसाट यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप निवडणुकीत झाले नव्हते. शिरसाट यांनी पालकमंत्री पद सांभाळल्यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली ती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्याचे कार्यालय सुरू केल्याच्या घटनेपासून. पालकमंत्री गेल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकांचे तेच प्रमूख असतात. मात्र, पालकमंत्री पदासाठी स्वतंत्र कर्मचारी असावेत आणि कार्यालयीन कामकाजासाठी स्वतंत्र कक्ष असावा अशी मागणी करण्यात आली आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ती मान्यही केली. केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच नाही तर सोलापूरमध्येही असे कार्यालय असल्याचे समर्थन अधिकारी करू लागले.
या वादातून बाहेर पडण्यापूर्वी समाजकल्याण खात्यातून लाडक्या बहिणीसाठी वितरित केला जाणारा निधी कपातीवर संजय शिरसाट यांनी आक्षेप घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कारभारावर टीका केली. परस्पर निधी कपात होणार असेल तर समाजकल्याण विभागच बंद करा, अशी मागणीही त्यांनी माध्यमांमध्ये केली. सरकारचे मंत्रीच सरकारच्या कारभारावर खूश नाहीत, असा संदेश ते देत होते. त्यामुळे संजय शिरसाट अलिकडच्या काळात सतत चर्चेत होते. निधी कपातीच्या मुद्दयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच बोलतील, असे म्हणत अजित पवार यांनी शिरसाट यांच्या टीकेला अनुल्लेखाने मारले. औरंगजेबाच्या कबरीवरुन रा. स्व. संघाच्या भैय्याजी जोशी यांच्या औरंगजेब संदर्भहीन असल्याच्या विधानासही संजय शिरसाट यांनी विरोध केला होता. त्यांना विरोध नाही पण कबर हटवली गेली पाहिजे, असे ते म्हणाले होते.
जिल्ह्याच्या कारभारात मंत्री अतुल सावे यांच्याबरोबरही त्यांचे वादच झाले. शिष्टाचार डावलला म्हणून मंत्री अतुल सावे महापालिकेच्या बैकठीपूर्वी निघून आले होते. अशा वातावरणात मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर मुंबईतील एका महिलेने छळाचा आराेप केला. ते प्रकरण पुढे मिटले आणि व्हिट्सच्या खरेदीतील अनागोंदी समोर आली. १११० कोटी रुपयांचे मूल्यांकन असणारी इमारत कमी किंमतीमध्ये जाहीर लिलावातून विक्री करण्याचा घाट घालण्यात आला होता. ते प्रकरण समोर आल्याने त्या व्यवहारातून शिरसाट यांनी माघार घेतली. आता ते पुन्हा नव्या वादात अडकल्याने मंत्री शिरसाट यांचा पाय खोलात गेल्याची चर्चा रंगू लागली आहे.