Amit Shah in Kolkata: रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे मिशन २०२६चे रणशिंग फुंकले. बंगालच्या ऐतिहासिक रामलीला मैदानात हजारो समर्थकांच्या उपस्थितीत शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल सरकारला धारेवर धरले. सभेच्या सुरूवातीला अमित शाह यांनी बंगाल आणि देशासाठी आदरणीय अशा स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांना नमन केले. सभेच्या सुरूवातीलाच अमित शाहांनी म्हटले की, “बंगालमध्ये भाजपाचं सरकार येणार आणि घुसखोरी बंद होईल.” असे सांगताना त्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणाही दिल्या.
ममता दीदींचा काळ संपणार?
अमित शाह यांनी भाषणात म्हटले की, “राज्यात तुष्टीकरणाचे राजकारण, घोटाळे आणि राजनैतिक हिंसा आता टोकाला पोहोचली आहे. एसएससी घोटाळा असो वा रेशन घोटाळा, बंगाल सरकार तरूणांचे हक्क हिरावून सत्तेची मलई खात आहे.” यावेळी बोलताना शाह यांनी असा दावा केला आहे की, २०२६मध्ये टीएमसीची पाठवणी होणारच आणि भाजपाचं सरकार येणारच आहे. लक्षात ठेवा की, २०२६मध्ये भाजपाचे मुख्यमंत्री शपथ घेतील.”
ऑपरेशन सिंदूर आणि राष्ट्रवाद
ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले की, “मोदी सरकारने जेव्हा दहशतवादाविरूद्ध साहसी पाऊल उचलले तेव्हा ममता सरकारने या संवेदनशील मुद्द्यावरूनही राजकारण केले.” त्यावेळी ममता बॅनर्जींनी बंगालच्या महिलांना उद्देशून म्हटले की, कुंकूवाची किंमत ओळखा आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला उत्तर द्या. त्यांनी कोट्यवधी माता आणि महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. येत्या काळात त्याच महिला ममता बॅनर्जींना कुंकूवाचं महत्त्व सांगतील.”
भाजपा २०२६ च्या पश्चिम बंगालमधील मोहिमेची रचना या पुढील काही मुद्द्यांवरून करू शकते.
१. मतपेढी तुष्टीकरणाचे राजकारण २.ऑपरेशन सिंदूरला विरोध ३.हिंदूंचा कथित छळ आणि ४.बेकायदेशीर घुसखोरीचा जनगणनाशास्त्रावरील परिणाम.
गृहमंत्र्यांनी मुर्शिदाबादमधील अलिकडच्या हिंसाचाराचा उल्लेख करत म्हटले की, “आम्ही राज्य सरकारला बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) तैनात करण्यास सांगत राहिलो, पण त्यांनी काहीही केले नाही. शेवटी आमच्या कार्यकर्त्यांना न्यायालयात जावे लागले. त्यानंतरच बीएसएफने हस्तक्षेप केला आणि लोकांचे जीव वाचवले. हिंसाचाराच्या वेळी एक राज्यमंत्री उपस्थित होते; ही राज्य पुरस्कृत दंगल होती.”
भाजपाचा असा विश्वास आहे की मुर्शिदाबादमधील हिंसाचारात ज्याप्रकारे एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यात आले, तो २०२६ च्या निवडणूक प्रचारात एक प्रमुख मुद्दा ठरेल असे यावेळी पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले. “या देशातील लोकांना तुष्टीकरणावर आधारित सरकार नको, तर देशभक्त सरकार हवे आहे”, असेही शाह यांनी यावेळी अधोरेखित केले.
टीएमसीची भूमिका काय?
राष्ट्रीय सुरक्षा आणि ऑपरेशन सिंदूरसंदर्भातील शाह यांच्या वक्तव्यावर टीएमसीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. टीएमसीने त्यांच्यावर स्वत:वरील दोष फेटाळण्याचा आणि देशाप्रती जबाबदाऱ्यांमध्ये अपयशी ठरल्याचा आरोप केला. जर बंगालमध्ये खरोखरच घुसखोरी होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. कारण बीएसएफ त्यांच्या मंत्रालयाखाली काम करते असे टीएमसीने म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसने ऑपरेशन सिंदूरला विरोध केल्याचा त्यांचा आरोपही पक्षाने फेटाळून लावला.
“अमित शाह दोषी आहेत. जर राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली जात असेल, तर गृहमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा. दहशतवाद्यांना देशात प्रवेश करतात आणि पहलगाममध्ये २६ पर्यटकांना मारतात. याचाच अर्थ गृहमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. याआधीही पुलवामासारख्या घटना घडल्या होत्या. तिथे निमलष्करी दलांनी विमानांसाठी विनंती केली होती. मात्र, ती विनंती नाकारण्यात आली होती. हे सर्व रेकॉर्डवर आहे”, असे ज्येष्ठ तृणमूल काँग्रेस नेते डॉ. काकोली घोष दस्तीदार यांनी म्हटले आहे. दस्तीदार असेही म्हणाले की, “तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतेच जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि राजौरीला भेट दिली होती. सीमावर्ती गावांमधील रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची तीव्र भावना त्यांनी प्रत्यक्ष पाहिली.”
सागरिका घोष यांनी केली शाहांच्या राजीनाम्याची मागणी
ममता बॅनर्जींना लक्ष्य करताना अमित शाह यांनी म्हटले की, “त्यांनी बंगालला घुसखोरी आणि महिलांवरील अत्याचारांचे राज्य बनवले आहे. त्या सत्तेत आल्यापासून शेकडो भाजपा कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे.
सागरिका घोष यांनी अमित शाहांवर वक्तव्यांना उत्तर देताना म्हटले की, “ते लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यामुळे देश कमकुवत होईल. अमित शाह आणि त्यांची टोळीच खरे देशद्रोही आहेत. गृहमंत्री म्हणून अमित शाह पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा. सागरिका घोष यांनी असा दावा केला की अमित शाह ‘फोडा आणि राज्य करा’ असे राजकारण करत आहेत.
बांगलादेशातील देशांतर्गत परिस्थिती आणि विकसित होत असलेल्या घडामोडी पाहता भाजपा राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक प्रचार करण्याची योजना आखत आहे हे स्पष्ट आहे. याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठीच मोठ्या प्रमाणात घुसखोरीला परवानगी दिली असल्याचे बंगालच्या जनतेला पटवून देऊ असे मत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे.
राज्याच्या सुरक्षेसंदर्भात बोलताना शाह यांनी म्हटले की, “यावेळी बंगालची लढाई थेट राष्ट्राच्या सुरक्षेशी जोडलेली आहे. पश्चिम बंगालची आगामी निवडणूक केवळ राज्याच्या भविष्याबद्दल नाही तर भारताच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याबद्दल देखील आहे.” पश्चिम बंगालच्या या दौऱ्यात अमित शाहांनी केंद्रीय न्याय वैद्यक प्रयोगशाळेचे उद्घाटन केले आणि त्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या निवासस्थानालाही भेट दिली.