दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतर आपच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र, या आंदोलनांदरम्यानचा आपच्या नेत्याचा एक व्हिडीओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

आम आदमी पक्षाचे उत्तर प्रदेश किसान संघटनेचे उपाध्यक्ष राम गुप्ता (वय ४६) यांचा आंदोलनादरम्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्यांनी माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना आपण आपच्या आंदोलनात सहभागी नसल्याचे सांगितले. मात्र, काही वेळातच त्यांनी ‘केजरीवाल जिंदाबाद’, अशी घोषणा दिली.

हेही वाचा – अरविंद केजरीवाल : भाजपाचा अचूक लक्ष्यभेद की, ‘अति’ ची माती?

खरे तर दिल्लीत निदर्शने करणाऱ्या आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत होते. त्यावेळी आपल्याला अटक होऊ नये म्हणून त्यांनी खोटे बोलत आपण आंदोलनाचा भाग नसल्याचे म्हटले. तसेच तिथून पोलीस जाताच आपण खोटे बोलल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे माध्यमाचे प्रतिनिधीही आश्चर्यचकित झाले.

या संदर्भात द संडे एक्स्प्रेसशी बोलताना राम गुप्ता यांनी सांगितले, ”आपला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणार याची त्यांना पूर्ण कल्पना होती. अनेकांनी याचे मीम्स सोशल मीडियावर शेअर केल्याचेही मी पाहिले. मी त्यावेळी खोटे बोललो हे मी कबूल करतो. मात्र, मी निदर्शनात होतो म्हणून खोटे बोललो, असे नाही. तर अटक केल्यानंतर पोलीस आंदोलकांना बवानाच्या जंगलात नेऊन सोडणार होते आणि मला त्या जंगलात जायचे नव्हते म्हणून मी खोटे बोललो.

”गेल्या दशकभरात आम्ही पक्षाच्या अनेक आंदोलनांत सहभाग घेतला. प्रत्येक वेळी आम्हाला ताब्यात घेऊन शहरापासून दूर कुठे तरी लांब सोडले जायचे. तिथून मग एकटे परत यावे लागायचे. आता तर आम्हाला बवानाच्या जंगलात सोडणार होते. पण, या जंगलातून परत यायला तुम्हाला रिक्षासुद्धा मिळत नाही. जर शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्यांबरोबर सरकार असे खेळ करीत असतील, तर आमच्याकडेही योजना तयार नसावी का?” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – सुनील तटकरेंचाही कडेलोट करावा लागेल… शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे धक्कादायक वक्तव्य

गुप्ता यांनी सांगितले, “२०१३ मध्ये झालेल्या अन्ना आंदोलनात ते सहभागी होते. त्यापूर्वी ते पत्रकार होते. मात्र, २०१३ नंतर माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यात आला. त्यामुळे मी पत्रकारितेतून बाहेर पडलो. खरे तर ज्यावेळी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशा प्रकारे हल्ला केला जातो, तेव्हा खोटे बोलणे चुकीचे नाही.”