छत्रपती संभाजीनगर : सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवार कोण यावर एकमत होत नसल्याने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम आहे. गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन मतदारसंघातील उमेदवार ठरविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली. मात्र, उमेदवाराच्या क्षमता आणि मिळू शकणारी मते यामुळे तिढा कायम असल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघातून शिंदे गटाकडून मराठा आरक्षण लढ्यातील कार्यकर्ते विनोद पाटील यांच्या नावावर चर्चा सुरू होती.

हेही वाचा : हातकणंगलेत शेतकरी नेत्यांची भाऊगर्दी

पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे नावही उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र, ते निवडून येत असणारा पैठण हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो. स्वत:च्या हक्काचे मतदान नसताना त्यांना उमेदवारी देण्याबाबत नेत्यांमध्ये संभ्रम आहे. दुसरीकडे अपक्ष म्हणून का असेना निवडणुकीमध्ये उतरुच असे सांगणारे विनोद पाटील यांनी शिंदे गटातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ते आता मुंबईत ठाण मांडून असले तरी जागेबाबतचा तिढा अद्याप कायम आहे. ही जागा भाजपला मिळावी असे प्रयत्न सुरू होते. मात्र, जागा मिळण्याची शक्यता ४० टक्केच असल्याचे भाजपचे नेते सांगतात. दरम्यान मुख्यमंत्र्यांशी अजून भेट झाली नाही. आज ती होईल, असे विनोद पाटील यांनी ‘ लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांचेही नाव आता उमेदवारांच्या यादीत चर्चेत आले आहे. राजेंद्र जंजाळ हे महापालिकेमध्ये नगरसेवक होते. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी त्यांच्याकडे जिल्हा प्रमुखपदाची सूत्रे देण्यात आली आहेत.

हेही वाचा : धुळ्यात काँग्रेस उमेदवाराच्या शोधात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमेदवारीचा घोळ मिटत नसल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे येऊ शकतील का, याची चाचपणी शिंदे गटातून केली जात आहे. प्रवक्ते संजय शिरसाट यांनी तर त्यांना उमेदवारी न दिल्याने ते नाराज आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करू, असे म्हटले आहे. दरम्यान अंबादास दानवे यांनी या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आज हिंदीतील एक शेर समाजमाध्यमात लिहून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली- ‘ हमारी अफवाह के धुंए वही उठते है, जहॉ हमारे नाम से आग लग जाती है. ’ छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबतचा तिढा मात्र अजून कायम आहे.