पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी च्या माध्यमांतून युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थित निवड झालेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी अजित पवार म्हणाले, आता तुम्ही काही कालावधीत अधिकारी पदावर काम करणार आहात, सगळ्यांनी व्यवस्थित जबाबदारीने काम पार पाडा, पण कधी चुकून आपलं काही चुकलं तर त्या ठिकाणी मोठी बदनामी आपल्याला सहन करावी लागते. त्या गोष्टी होता कामा नये, तसेच तुमच्याकडे येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवा सगळी लोक लांब गावातून तुमच्याकडे येतात कुणालाही काम न करता परत पाठवू नका, असा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
तसेच ते पुढे म्हणाले, मी राजकीय जीवनाला सुरुवात केली होती, त्यावेळची एक गोष्ट आठवते ती म्हणजे ए आर अंतुले साहेबांचे मुख्यमंत्री पद गेले होते. १९७९/८० चा काळ असेल. त्यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी अजित निंबाळकर होते, सिमेंटचे खूप मोठ्या प्रमाणावर शॉर्टजे होते की, विचारायची सोयच नव्हती. अजित निंबाळकर यांच्या हातामध्ये सिमेंटच परमिट देण्याचे अधिकार होते, त्यामुळे मी निंबाळकर साहेबांकडे गेलो आणि म्हणालो, काटेवाडीमध्ये घर बांधायला काढले आहे. त्यासाठी सिमेंट पाहिजे असल्याचे त्यांना सांगितले. त्यावेळी मी मनामध्ये ठरवलं होत बंगला बांधल्याशिवाय लग्न करायच नाही. बायकोला पत्र्याच्या घरात आणू काय , असे अजित पवार म्हणताच उपस्थित नागरिकांमध्ये एकच हशा पिकला.
तसेच ते पुढे म्हणाले, मला सीमेंटच परमिट देण्यात आलं, त्यावेळी एक सीमेंटच पोत २७ रुपये ८५ पैशांना होत, मला एक हजार पोती दिली आणि माझ घर बांधुन झाल. तसेच ज्यावेळी मी घराकडे पाहतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अजित निंबाळकर येत असतात,असे म्हणताच पुन्हा उपस्थितामध्ये हशा पिकला.