पुणे : नाट्यगृहांमध्ये प्रयोग सुरू असताना उंदराने दिलेल्या मनस्तापाच्या पार्श्वभूमीवर आता नाट्यगृहामध्ये खाद्यपदार्थ नेण्यास मनाई, या जुन्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याशी चर्चा करून पावले उचलणार असल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी (३१ मे) रात्री नाटकाचा प्रयोग सुरू असताना एका महिला प्रेक्षकाला उंदराचा त्रास झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सांस्कृतिक विभागामार्फत विद्युत विभाग, भवन विभागासह नाट्य कलाकार आणि नाट्य व्यवस्थापकांची संयुक्त बैठक झाली. सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ, नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे, भवन आणि विद्युत विभागातील अधिकारी, नाट्य व्यवस्थापक मोहन कुलकर्णी, प्रवीण बर्वे, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, सत्यजित धांडेकर, शिरीष रायरीकर सहभागी झाले होते.
नाटकाचा प्रयोग सुरू होण्यापूर्वी नाट्यसंस्थांच्या प्रतिनिधींकडून प्रेक्षकांनी नाट्यगृहामध्ये खाद्यपदार्थ आणू नये, असे आवाहन करण्यात येणार आहे. प्रयोग सुरू होण्याआधी आणि संपल्यानंतर नाट्यगृहाची स्वच्छता आणि उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी सर्व नाट्यगृहांमध्ये पिंजरे लावणे, सर्व नाट्यगृहांमध्ये पेस्ट कंट्रोल अशा विविध उपाययोजना महापालिकेच्या सांस्कृतिक विभागातर्फे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.