पुणे : आषाढी वारी सोहळ्यातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी असणाऱ्या जड-अवजड वाहनांची उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे.
संबंधित वाहनधारकांनी १९ जूनपर्यंत वाहनांची मोफत पूर्वतपासणी करावी आणि वाहन योग्यता प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन पुण्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (आरटीओ) करण्यात आले आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून १९ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पायी वारी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची मोठी वाहने, पाण्याचे टँकर आणि इतर वाहने असतात. वारी सोहळ्यादरम्यान वाहन अचानक बंद पडणे, तांत्रिक दोष निर्माण होऊन वाहतूक कोंडी, अपघात अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहनांची नियमित तपासणी करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर पुणे आरटीओकडून वाहनांची तांत्रिक तपासणी करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे.
वारी सोहळ्यात सहभागी वाहनधारकांना आळंदी रस्ता येथील चाचणी मैदान आणि दिवे येथील स्वयंचलित मार्गिका प्रणालीवर तपासणी करण्यासाठी वाहने घेऊन जावी लागणार आहे. वाहन तपासणीवेळी नोंदणी प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रमाणपत्र, चालकाचा परवाना आदी कागदपत्रे मुदतीत असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच स्वतंत्र नोंदवहीत नोंदणी करून विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक, वाहतूक पोलीस आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या पत्रानुसार वारीत सहभागी वाहनांची योग्यता तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी पूर्णपणे मोफत असणार असल्याने वाहनधारकांनी मुदतीत तपासणी करून घ्यावी. – स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.