पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून ११.२७ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा आहे. दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कायम राहिल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्गही कायम ठेवण्यात आला आहे.खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांतून मिळून शहराला पाणीपुरवठा केला जातो.
गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून गेल्या आठवड्यात पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आला. हा विसर्ग कमी असला, तरी मंगळवारी तो कायम ठेवण्यात आला. धरणाच्या सांडव्यावरून मंगळवारी सकाळी नऊ वाजता ३ हजार ८८३ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला. तो अकरा वाजल्यानंतर ७ हजार ७०० क्युसेक असा करण्यात आला.
या चारही धरणांमध्ये मिळून सध्या ११.२७ टीएमसी एवढा पाणीसाठा असून, गेल्या दोन दिवसांमध्ये या पाणीसाठ्यात सुमारे एक टीएमसीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणांमध्ये ३.५९ टीएमसी एवढा पाणीसाठा होता, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.