पुणे : आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील सट्टेबाजी उघड करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारे पोलीस अधिकारी अमितेश कुमार यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आव्हान आहे. वाहतूक समस्या, तसेच सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अमितेश कुमार यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

अमितेश कुमार भारतीय सेवा पोलीस सेवेतील १९९५ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. मावळते पोलीस आयुक्त रितेश कुमार १९९२ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार रितेश कुमार यांची गृहरक्षक दलाच्या महासमापदेशपकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मितभाषी आणि शांत अशी प्रतिमा असलेल्या रितेश कुमार यांनी १६ डिसेंबर २०२२ रोजी पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाचा सूत्रे स्विकारली. शहरातील गु्न्हेगारीचा बिमोड करण्यासाठी गुंडांविरुद्ध ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) आणि ‘एमपीडीए’ (झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याचा) कारवाईचा बडगा उगारला. रितेश कुमार यांनी शहरातील ११५ गुंड टोळ्यांचे म्होरके आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई केली. सहाशेहून अधिक गुंड टोळ्यांमधील सराइतांवर मोक्का कारवाई करण्यात आली. ‘एमपीडीए’ कायद्यान्वये दहशत माजविणाऱ्या शंभर गुंडांना कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. रितेश कुमार यांच्या कारवाईमुळे गुंडांना जरब बसली.

हेही वाचा…अजब कारभार…आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या खासगी कार्यालयात दिमतीला सरकारी कर्मचारी ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमितेश कुमार नागपूर पोलीस आयुक्त होते. नागपूर शहरात २००५ ते २००६ या कालावधीत अमितेश कुमार पोलीस उपायुक्त होते. त्यावेळी त्यांनी आंतराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावरील सट्टेबाजीचा प्रकार उघडकीस आणला होता. सट्टेबाजीत दाऊद इब्राहिम टोळीतील सराइत सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. अमितेश कुमार यांची पहिल्यांदाच पुणे शहरात नियुक्ती झाली आहे. नागपूरच्या तुलनेत पुण्याचा विस्तार मोठा आहे. वाढत्या लोकसंख्यांमुळे गु्न्हेगारी वाढत असून, संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आव्हान अमितेश कुमार यांच्यासमोर आहे. शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी अमितेश कुमार यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरणातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून वाहतूक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. मुंबई, ठाण्यानंतर पुणे शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालणे, तसेच गु्न्ह्यांची उकल करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या, तसेच तांत्रिक, पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी सातत्याने गृहविभागाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती मोहिम राबवावी लागणार आहे.