पुणे : घाऊक बाजारात हिरवी मिरची, घेवडा, भुईमूग शेंग या फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली. टोमॅटो, वांगी, मटार या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
पावसामुळे राज्य, तसेच परराज्यातून फळभाज्यांची आवक कमी होत आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेशातून मिळून १५ ते २० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून २ ते ३ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून २ ते ३ टेम्पो मटार, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातून मिळून २ ते ३ टेम्पो घेवडा, कर्नाटकातून २ टेम्पो भुईमूग शेंग, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि मध्य प्रदेशातून ८ ते १० टेम्पो लसूण, इंदूर येथून ३ ते ४ टेम्पो गाजर, बंगळुरूतून २ ते ३ टेम्पो टोमॅटो अशी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ५५० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर ५ ते १० टेम्पो, भुईमूग शेंग १०० ते १५० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ५० ते ६० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४० ते ४५ ट्रक बटाट्याची आवक झाली.
लिंबू, चिकू, पपईच्या दरात वाढ
घाऊक फळबाजारात पपई, लिंबू, चिकूच्या दरात वाढ झाली आहे. खरबूजच्या दरात घट झाली असून, अननस, मोसंबी, संत्री, डाळिंब, पेरुचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक फळबाजारात मोसंबी २५ ते ३० टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे ८०० ते एक हजार गोणी, कलिंगड ७ ते ८ टेम्पो, खरबूज ५ ते ४ टेम्पो, चिकू ५०० खोकी, पेरू ३०० ते ४०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), तसेच केरळहून ४ ट्रक अननस अशी आवक झाली.
आवक घटल्याने फुले महागली
पावसामुळे आवक घटल्याने फुलांच्या दरात वाढ झाली आहे. पावसामुळे फुले भिजली आहेत. भिजलेल्या फुलांना दर कमी मिळाली आहेत. सुक्या फुलांना दर मिळाले आहे. बाजारात चांगल्या प्रतिच्या फुलांचा तुटवडा जाणवत असल्याने दरात वाढ झाली असल्याचे फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.